कर्णधार रोहित शर्माने सलग दुसऱ्या सामन्यात झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशचा Super 4 गटातील पहिल्या सामन्यात पराभव केला आहे. ७ गडी राखून विजय मिळवत भारताने या स्पर्धेत सध्याच्या घडीला आपणच सर्वोत्तम असल्याचं पून्हा एकदा दाखवून दिलं आहे. बांगलादेशने दिलेलं १७४ धावांचं आव्हान भारताने रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर पूर्ण केलं. दुसरीकडे रोहित शर्माने नाबाद ८३ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी सावध पवित्रा घेत, योग्य वेळी बांगलादेशी गोलंदाजांवर हल्लाबोल करत भारताचं सामन्यातं आव्हान कायम राखलं. बांगलादेशकडून शाकिब अल हसन, मश्रफी मोर्ताझा आणि रुबेल हसन यांना प्रत्येकी १-१ बळी मिळाला. त्याआधी, कर्णधार मश्रफी मोर्ताझा आणि मेहदी हसनमध्ये झालेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर, बांगलादेशने Super 4 गटातील पहिल्या सामन्यात भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. ४९.१ षटकात बांगलादेशचा संघ १७३ धावांपर्यंत मजल मारु शकला. पाकिस्तानविरुद्ध सामन्याप्रमाणेच या सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा केला. रविंद्र जाडेजा- भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरहाने केलेल्या माऱ्यासमोर बांगलादेशचे गोलंदाज तग धरु शकले नाहीत. सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात अतिशय खराब झाली. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रित बुमराहने दोन्ही सलामीवीरांना एकामागोमाग एक माघारी धाडत बांगलादेशला धक्का दिला. यानंतर हार्दिक पांड्याच्या जागेवर संघात स्थान मिळालेल्या रविंद्र जाडेजाने बांगलादेशी फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे बांगलादेश मोठी धावसंख्या उभारतो की नाही असं वाटायला लागलं होतं. मात्र आठव्या विकेटसाठी मश्रफी मोर्ताझा आणि मेहदी हसनने केलेल्या भागीदारीमुळे सामन्याचं चित्र पालटलं. बांगलादेशी फलंदाजांनी शेवटच्या काही तासांमध्ये चांगल्या धावा जमवत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. रविवारी भारताचा सामना पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.