पीटीआय, सिल्हेट (बांगलादेश) : जेमिमा रॉड्रिग्जच्या (५३ चेंडूंत ७६ धावा) अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भरीव कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या लढतीत श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या १५१ धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार चमारी अटापट्टू (५) आणि मालशा शेहानी (९) लवकर बाद झाल्या. सलामीवीर हर्षित समरविक्रमाने (२६) संघाच्या धावसंख्येत भर घातली. मात्र, तिलाही मोठी खेळी करता आली नाही. यानंतर हसिनी पेरेरा (३० धावा) वगळता इतर श्रीलंकन फलंदाजांचा भारतीय गोलंदाजीसमोर निभाव लागला नाही. अखेर श्रीलंकेचा डाव १८.२ षटकांत १०९ धावांवर आटोपला. भारताकडून दयालन हेमलता (१५ धावांत ३ बळी), दीप्ती शर्मा (१५ धावांत २ बळी) आणि पूजा वस्त्रकार (१२ धावांत २ बळी) यांनी प्रभावी मारा केला.

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताचीही सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर शफाली वर्मा (१०) आणि स्मृती मानधना (६) लवकर माघारी परतल्याने भारतीय संघ अडचणीत होता. यानंतर दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या जेमिमाने संघाचा डाव सावरला. तिने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या साथीने (३० चेंडूंत ३३ धावा) तिसऱ्या गडय़ासाठी ९२ धावांची निर्णायक भागीदारी रचत भारताला सुस्थितीत पोहोचवले. हरमनप्रीत बाद झाल्यानंतरही जेमिमाने आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली. जेमिमाने आपल्या खेळीत ७६ धावांच्या खेळीत ११ चौकार व एक षटकार लगावला. त्यामुळे भारताला २० षटकांत ६ बाद १५० अशी धावसंख्या उभारता आली. श्रीलंकेकडून ओशादी रणसिंघेने (३/३२) गोलंदाजीत चमक दाखवली.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ६ बाद १५० (जेमिमा रॉड्रिग्ज ७६, हरमनप्रीत कौर ३३; ओशादी रणसिंघे ३/३२) विजयी वि. श्रीलंका : १८.२ षटकांत सर्वबाद १०९ (हसिनी पेरेरा ३०, हर्षिता समरविक्रमा २६; दयालन हेमलता ३/१५, पूजा वस्त्रकार २/१२)

सामनावीर : जेमिमा रॉड्रिग्ज