Bangladesh vs Sri Lanka, World Cup 2023: बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील विश्वचषक सामन्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. लंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला सोमवारी (६ नोव्हेंबर) नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर टाईमआउट घोषित करण्यात आले. मॅथ्यूज नियमानुसार बाहेर होता, पण बांगलादेशचा कर्णधार शाकिब-अल-हसनला खराब वागणुकीमुळे टीकेला सामोरे जावे लागत आहे. अनेक दिग्गजांना असे वाटले की, हे खेळाच्या भावनेविरुद्ध आहे आणि शाकिबने अपील मागे घ्यायला हवे होते.

वास्तविक, श्रीलंकेच्या डावातील २५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सदिरा समरविक्रमा बाद झाला. त्याच्यानंतर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला आला. मॅथ्यूज जेव्हा खेळपट्टीवर आला तेव्हा त्याने चुकीचे हेल्मेट आणले. त्याने पर्यायी खेळाडूला दुसरे हेल्मेट आणण्यास सांगितले. त्यामुळे पंच आणि बांगलादेशी खेळाडूंना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. तो निर्धारित वेळेत हेल्मेट घेऊन येऊ शकला नाही. शाकिबने वेळ काढण्याची तक्रार केली त्यानंतर पंचांनी मॅथ्यूजला बाद घोषित केले. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी नेमकं मैदानावर काय झाले? याबाबत माजी वेस्ट इंडीजचे खेळाडू आणि समालोचक इयन बिशप यांनी संपूर्ण माहिती सांगितली आहे.

वेस्ट इंडीजचे माजी दिग्गज ईयान बिशप यांनी लाईव्ह सामन्यादरम्यान मोठा खुलासा केला. त्यांच्यामते शाकिबचे हे वर्तन खेळ भावणेच्या विरोधात होते. लाइव्ह सामन्यात शाकिब आणि मॅथ्यूज यांच्यात चर्चा झाल्याचेही दिसले. पण दोघांमधील नेमकी चर्चा काय झाली. वेस्ट इंडीजचे माजी दिग्गज इयन बिशप सध्या विश्वचषक स्पर्धेत समालोचकाची भूमिका पार पाडत आहेत. त्यांनी लाइव्ह सामन्यात संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले की, “पंचांनी अपील मागे घेण्यासाठी शाकिब-अल-हसनला दोन वेळा विचारले, पण दोन्ही वेळीस ‘नाही’ असेच म्हणत नकार दिला. यातून शाकिबने स्वार्थीपणा केला आहे, हे स्पष्ट होते.” बिशप हे टाईम आऊटचे प्रकरण घडल्यानंतर मैदानात मॅथ्यूजशी चर्चा करताना दिसले होते.

नियम काय सांगतो?

क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मिरिलिबोन क्रिकेट क्लबनुसार, विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज निवृत्त झाल्यानंतर, येणाऱ्या फलंदाजाने तीन मिनिटांत चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. असे झाले नाही तर येणारा फलंदाज टाईम आऊट होईल. त्याच वेळी, एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या नियमांनुसार, विकेट पडल्यानंतर, नवीन फलंदाजाला दोन मिनिटांत चेंडू खेळायचा असतो.

हेही वाचा: AUS vs AFG: अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू सामन्याला मुकण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बांगलादेशने तीन गडी राखून सामना जिंकला

विश्वचषक स्पर्धेतील ३८व्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा तीन गडी राखून पराभव केला आहे. या पराभवासह श्रीलंकेचा संघ अधिकृतपणे उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ४९.३ षटकात २७९ धावा केल्या. बांगलादेशने सात गडी गमावून २८२ धावा केल्या आणि सामना जिंकला.