India vs New Zealand Semi Final: ICC क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील सर्वात महत्त्वाचा करो वा मरो सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये पार पडत आहे. भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंड विरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना भारतासाठी विश्वचषकात सलग १० वा विजय नावे करण्याची व त्याही पेक्षा अंतिम फेरीत दाखल होण्याची सुवर्णसंधी असणार आहे. जितका महत्त्वाचा हा सामना आहे तितकेच या सामन्यांवरून चर्चेत असणारे वादही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी बीसीसीआयने न सांगता वानखेडेच्या खेळपट्टीत बदल केल्याचा आरोप काही माजी खेळाडूंनी सुद्धा लगावला आहे. यावर आता बीसीसीआयने स्पष्टीकरण देत वादावर मौन सोडलं आहे.
ब्रिटीश वृत्त आउटलेट डेली मेलने एका अहवालात बीसीसीआयने आयसीसीची परवानगी न घेता खेळपट्टी बदलली आहे असा दावा केला आहे. आजचा सामना हा वानखेडेमध्ये पीच क्रमांक ६ वर होणार आहे जिथे अगोदरच दोन सामने झाले आहेत. यामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या निकालावर परिणाम होऊ शकतो अशीही चर्चा सुरु आहे. यावरून टीम इंग्लंडचा खेळाडू मायकल वॉन याने सुद्धा टीका करत प्रत्येक खेळासाठी फ्रेश पीच असायला हवं हे इतकं साधं सरळ गणित आहे, अशी पोस्ट केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जगात, ICC स्पर्धांसाठी खेळपट्ट्या तयार करणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया असते. प्रत्येक खेळासाठी कोणती खेळपट्टी वापरली जाईल हे निर्धारित करण्यासाठी प्रशासक मंडळाचा सल्लागार यजमान मंडळाशी चर्चा करतो. तथापि, बीसीसीआयवर विशेषत: चालू विश्वचषकादरम्यान हा प्रोटोकॉल आपल्या फायद्यासाठी सतत बदलल्याचा आरोप आहे.
दरम्यान, या आरोपांवर उत्तर देताना बीसीसीआयने अशी कोणतीही चूक झाल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. बीसीसीआयच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, खेळपट्टी निवडण्याच्या प्रक्रियेत आयसीसीच्या स्वतंत्र सल्लागाराशी बीसीसीआयने चर्चा करूनच निर्णय घेतलेले आहेत.
या खेळपट्टीच्या वादापूर्वी, भारतीय संघ व्यवस्थापनावर वानखेडे खेळपट्टीवरील गवत कमी जास्त केल्याचा आरोप झाला होता. बंगळुरूमधील नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यानंतर, संघाने संथ खेळपट्टीला प्राधान्य दिले, ज्यामुळे खेळपट्टीवरील गवत काढून टाकले गेले होते असेही म्हटले जात होते. एका सूत्राच्या हवाल्याने इंडियन एक्सस्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, संघाने संथ खेळपट्टी मागितली होती, पीचवरील गवत काढून टाकण्याचे हे मुख्य कारण होते, पण हा खेळ पालटणारा मुद्दा ठरणार नाही असेही सांगण्यात आले होते.
हे ही वाचा<< “हरभजन सिंग मौलानाला भेटून धर्मांतर..”, माजी पाक कर्णधाराच्या स्फोटक दाव्याने भडकला भज्जी! पाहा Video
तर इंडियन एक्सस्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, “बीसीसीआयच्या स्थानिक क्युरेटर्सनी विश्वचषकादरम्यान देशभरातील खेळपट्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक गट तयार केला होता. तर आयसीसीने देखील प्रत्येक सामन्यासाठी विविध ठिकाणी आपले तज्ज्ञ पाठवले होते.”