एप्रिल महिन्यात पाकिस्तानात होणाऱ्या Asia Emerging Nations Cup स्पर्धेसाठी बीसीसीआयने आपला संघ पाठवण्यास नकार दिल्यामुळे, पाक क्रिकेट बोर्ड सध्या कोंडीत सापडलं आहे. दोन देशांमधली बिघडलेल्या राजकीय संबंधामुळे सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने होत नाहीयेत. त्यामुळे बीसीसीआयने आपला संघ न पाठवल्यास, पाकिस्तानमधली ही स्पर्धा श्रीलंका अथवा बांगलादेशला हलवली जाण्याची संकेत मिळत आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेने २०१७ साली Asia Emerging Nations Cup स्पर्धेच्या यजमानपदाचा हक्क पाकिस्तानला दिला होता. मात्र आपलं मत विचारात न घेतल्याचं कारण देत बीसीसीआयने या स्पर्धेत संघ पाठवणार नसल्याचं सांगितलं.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजीम सेठी यांनी, स्पर्धेच्या यजमानपदाच्या प्रश्नावरुन कोलंबोत विशेष बैठक घेतली जाणार असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर भारतात होणाऱ्या आशिया चषकात सहभागी व्हायचं की नाही यावरही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड काही अटी पुढे करणार आहे. या अटींची पुर्तता न झाल्यास पाकिस्तानही भारतात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत सहभागी होणार नाही असं सेठी यांनी म्हटलं.

एप्रिल महिन्यात कोलकाता येथे आयसीसीची विशेष बैठक पार पडणार आहे. मात्र यासाठी आपल्याला भारतात येण्यास काडीचाही रस नसल्याचं सेठी यांनी बोलून दाखवलं. त्यामुळे Asia Emerging Nations Cup स्पर्धेच्या आयोजनावरुन आगामी काळात पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यात चांगलीच जुंपणार असं दिसतं आहे.