India Participate Asia Cup 2025 : भारतीय क्रिकेट संघ यावर्षी आशियाई करंडक स्पर्धा व महिला इमर्जिंग टीम्स आशिया चषक स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे दावे अनेक प्रसारमाध्यमांनी केले आहेत. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हे दावे खोटे असल्याचं सांगितलं आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी हे दावे फेटाळले आहेत. ते म्हणाले, “ही बातमी चुकीची आहे. आशियाई करंडक स्पर्धेतील भारताच्या सहभागाबाबत अद्याप कुठलीही बैठक झालेली नाही. त्यामुळे त्यावर निर्णय होणं खूप लांबची गोष्ट आहे.”
देवजीत सैकिया एएनआयला म्हणाले, “आज सकाळी आम्ही एक बातमी वाचली. यात म्हटलं होतं की बीसीसीआयने आशियाई करंडक स्पर्धा व महिला इमर्जिंग टीम्स आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही स्पर्धा आशियाई क्रिकेट परिषद आयोजित करणार आहे. मात्र, आतापर्यंत असा कुठलाही निर्णय झालेला नाही. ही बातमी खोटी आहे.”
देवजीत सैकिया काय म्हणाले?
देवजीत सैकिया म्हणाले, “आशिया चषक स्पर्धेत सहभागी व्हायचं की नाही याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. आशियाई क्रिकेट परिषदेच्या कार्यक्रमांबाबत, स्पर्धांबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. बीसीसीआयचं सध्या केवळ इंडियन प्रीमियर लीग व इंग्लंडविरोधातील मालिकांवर (महिला व पुरुष संघ) लक्ष आहे.”
बीसीसीआयने सर्व दावे फेटाळले
काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आशियाई क्रिकेट परिषदेच्या सर्व स्पर्धांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. बीसीसीआयने पुढच्या महिन्यात श्रीलंकेत महिला इमर्जिंग टीम्स आशियाई करंडक व सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पुरुषांच्या द्वैवार्षिक आशियाई करंडक स्पर्धेतून माघार घेतल्याचा दावा केला जात होता. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी हे सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख आहेत. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) एकटं पाडण्याची, त्यांची आर्थिक कोंडी करण्याची तयारी करत आहे. आशियाई करंडक स्पर्धेतून माघार घेणं हा त्याच हालचालींचा एक भाग असल्याचा दावा केला जात होता. मात्र हे दावे खोटे असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.