अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर नवीन अर्जांसाठी बीसीसीआयने वाढवलेल्या मुदतीवर सर्वोच्च न्यायालयाची प्रशासकीय समिती चांगलीच नाराज झाली आहे. बीसीसीआयच्या मुंबईतल्या बैठकीत प्रशासकीय समितीने बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांना आपली नाराजी बोलून दाखवली.
हा सर्व खटाटोप विराट कोहलीसाठी सुरु आहे का? असा सवाल प्रशासकीय समितीच्या सदस्यांनी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांना विचारला आहे. प्रशिक्षकपदासाठी ५ जणांचे अर्ज आलेले असताना पुन्हा नव्याने मुदतवाढ देण्याचं कारण काय? आम्हाला याबद्दल बीसीसीआयने अंधारात का ठेवलं असा सवाल समितीने बीसीसीआयला विचारला आहे.

कुंबळे यांची कामगिरी पाहता त्यांचीच या पदावर निवड होईल अशा समजुतीतून अनेकांनी या पदासाठी अर्ज केला नाही, त्यांना संधी मिळण्यासाठी ही मुदतवाढ दिल्याचं स्पष्टीकरण बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी दिलं. मात्र प्रशासकीय समितीच्या सदस्यांना हे स्पष्टीकरण पटलेलं नाही. यावर बीसीसीआयच्या आगामी बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.

भारतीय संघ व्यवस्थापकांचा गेल्या वर्षभरातला अहवाल प्रशासकीय समितीला न पुरवल्याबद्दलही समितीने जोहरी यांना फटकारलं आहे. ‘गेल्या वर्षभरात कर्णधार आणि प्रशिक्षकामध्ये पडद्यामागे इतक्या घटना घडत आहेत तर संघ व्यवस्थापकांनी याची माहिती बीसीसीआयला दिली नाही का?’ असा सवालही प्रशासकीय समितीने बीसीसीआयला विचारलाय.

अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर विरेंद्र सेहवाग, दोड्डा गणेश, लालचंद राजपुत, टॉम मुडी आणि रिचर्ड पायबस यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र अनिल कुंबळेंनी अचानक राजीनामा दिल्यामुळे बीसीसीआयने अर्ज मागवण्याची मुदत वाढवली. प्रशिक्षक निवडीचे अधिकार असलेली क्रिकेट सल्लागार समिती आता १० जुलैपासून आपल्या प्रक्रियेला सुरुवात करणार आहे.