भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी सकाळी अपघाताला झाला. दिल्लीहून रुरकीला जात असताना त्याची कार राष्ट्रीय महामार्ग ५८ वरील दुभाजकावर आदळून उलटली आणि नंतर आग लागली. मात्र, सुदैवाने २५ वर्षीय पंतचा जीव बसचालकाच्या मदतीने वाचला. त्यानंतर ऋषभ पंतचे चाहते बीसीसीआय मुख्यालयात कॉलवर कॉल करुन विविध प्रश्न विचारत आहेत.

पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या मणक्याचे, मेंदूचे सीटी स्कॅन आणि एमआरआय अहवाल सामान्य आहेत. पंत लवकर बरा होऊन मैदानात परतावे यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. मात्र, अनेक चाहते त्याच्या तब्येतीची काळजी करत आहेत.

बीसीसीआय मुख्यालयात कॉलवर कॉल –

भारतभरातील अनेक चाहते पंतच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. त्यामुळे ते मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात वारंवार फोन करत आहेत. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, काही चाहत्यांना हे जाणून घ्यायचे होते की पंत आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळेल की नाही, जे फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे. त्याचवेळी काहींनी विचारले की, यष्टीरक्षक फलंदाजाला कोणत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर पंतला प्रथम स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर त्याला डेहराडूनला हलवण्यात आले.

हेही वाचा – Rishabh Pant Car Accident: पंतला मैदानात परतण्यासाठी लागणार ‘इतका’ कालावधी; पाहा, काय म्हणाले डॉक्टर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऋषभ पंत आईला भेटायला चालला होता –

विशेष म्हणजे नवीन वर्षाच्या आधी पंत आपल्या आईला सरप्राईज देण्यासाठी रुरकीला जात होता. पोलिसांनी सांगितले की, हा अपघात उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यात पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला. हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंग यांनी अशी माहिती दिली. ते म्हणाले पंतला डुलका लागल्याने त्याची मर्सिडीज बेंझ कार दुभाजकाला धडकली आणि आग लागली. तेथून जाणाऱ्या हरियाणा रोडवेजच्या बसचा चालक आणि बाकीचे त्याच्या मदतीला धावून आले.