मराठमोळा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात आश्वासक सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी पहिल्या सत्राअखेरीस भारतीय संघाने कांगारुंच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं. रविचंद्रन आश्विनने पुन्हा एकदा भेदक मारा करत स्टिव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेड असे दोन महत्वाचे बळी घेतले.

सलामीवीर जो बर्न्स बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला तर वेडला आश्विनने ३० धावांवर माघारी धाडलं. यानंतर मैदानावर आलेल्या स्टिव्ह स्मिथकडून कांगारुंना अपेक्षा होत्या. परंतू आश्विनच्या गोलंदाजीवर पुजाराने सुरेख झेल पकडत स्मिथचा डाव संपवला. २०१६ नंतर स्टिव्ह स्मिथ कसोटीत शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

सुरुवातीच्या सत्रातच तीन बिनीचे शिलेदार माघारी परतल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर गेला. अखेरीस ट्रॅविस हेड आणि लाबुशेन यांनी उरलेलं सत्र खेळून काढत संघाची अधिक पडझड रोखली.