शारदा चिटफंड घोटाळ्यामुळे केवळ सामान्य गुंतवणूकदार नव्हे तर राज्यातील फुटबॉल संघांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घोटाळ्यामुळे अनेकांना काही कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. आय-लीग स्पर्धेतील युनायटेड क्लबही त्याला अपवाद नाही. या संघाने रान्टी मार्टिन्स व कोस्टा रिकाचा विश्वचषकपटू कालरेस हर्नान्डेझ यांच्यासारख्या खेळाडूंना करारबद्ध करताना संघासाठी गेल्या मोसमात १३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक ठेवले होते. त्यांचे मुख्य प्रायोजक असलेल्या प्रयाग संस्थेचे भवितव्य चिटफंड घोटाळ्यातून गुंतवणूकदारांना कसे पैसे परत मिळणार यावर अवलंबून आहे.
युनायटेड संघाचे संचालक नबाब भट्टाचार्य यांनी सांगितले, ‘‘दिलेला शब्द पाळण्याचे आश्वासन प्रयाग संस्थेने दिले आहे. त्यामुळे सध्या तरी अडचण नाही. मात्र खेळाडूंच्या बदलाबदलीच्या वेळी ते कितपत आमच्या पाठिशी राहू शकतील, याबाबत आम्हाला साशंकता वाटत आहे. रान्टी व हर्नान्डेझ यांना पुढच्या मोसमाकरिता अन्य संघांकडून मोठय़ा रकमांचे आश्वासन मिळत आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना आमच्याकडेच ठेवण्यासाठी आम्हाला मोठी रक्कम मोजावी लागणार आहे.
माजी विजेत्या ईस्ट बंगाल संघास रोझ व्हॅली कंपनीचे आर्थिक पाठबळ लाभले आहे. मात्र या कंपनीचेही यापुढे सहकार्य लाभेल की नाही, याबाबत ईस्ट बंगाल संघ व्यवस्थापन साशंक आहेत. मोहन बागान संघाचे देवाशिष दत्ता यांनीही चिटफंड घोटाळ्याचा फटका बंगालमधील अनेक फुटबॉल संघांना बसण्याची शक्यता व्यक्त केली. ‘‘राज्यात ३२५हून जास्त फुटबॉल संघ असून त्यांच्या प्रायोजकांची चिटफंडमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक आहे,’’ असेही दत्ता यांनी सांगितले.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे उपाध्यक्ष सुब्रतो दत्ता यांनी सर्व संघांना आपल्या संभाव्य प्रायोजकांची आर्थिक स्थितीविषयी खातरजमा करून मगच करार करावा, असे सुचविले आहे.