भारताच्या अंडर-१९ संघाचा माजी कर्णधार अवि बरोटचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. २९ वर्षीय अवि सौराष्ट्रकडून खेळत होता. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या निधनाची माहिती दिली. अविने यावर्षी सय्यद मुश्ताक अली करंडकातही शानदार शतक झळकावले होते. या व्यतिरिक्त, तो २०१९-२० मध्ये रणजी करंडक जिंकलेल्या सौराष्ट्रच्या विजेत्या संघाचा भाग होता.

कारकीर्द

अवि बरोट यष्टीरक्षक फलंदाज होता. कधीकधी तो गोलंदाजीही करायचा. त्याने आपल्या कारकिर्दीत ३८ प्रथम श्रेणी सामने, ३८ लिस्ट ए सामने आणि २० स्थानिक टी-२० सामने खेळले. बरोटने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत एक शतक आणि नऊ अर्धशतकांच्या मदतीने १५४७ धावा केल्या होत्या. लिस्ट ए सामन्यांमध्ये ८ अर्धशतकांच्या मदतीने १०३० धावा केल्या गेल्या. बरोट टी-२० क्रिकेटचा स्फोटक खेळाडू होता. त्याने देशांतर्गत टी-२० मध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांच्या मदतीने ७१७ धावा केल्या. टी-२० मध्ये त्याचा स्ट्राइक रेट १४६ आणि सरासरी ३८च्या आसपास होती.

२०१९-२०च्या हंगामात जेव्हा बंगालचा पराभव करून सौराष्ट्रने रणजी करंडक विजेतेपद पटकावले, तेव्हा अवि बरोट संघाचा एक भाग होता. याशिवाय, बरोट दोन वेळा रणजी ट्रॉफी फायनल देखील खेळला आहे. २०१५-१६मध्ये सौराष्ट्राला मुंबईने आणि २०१८-१९मध्ये अंतिम सामन्यात विदर्भाला पराभूत केले होते. दोन्ही वेळा अवि या संघाचा भाग होता.

हेही वाचा – टी २० वर्ल्डकपनंतर राहुल द्रविड होणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक

२०१०-११ कूचबिहार करंडकात गुजरातसाठी चार शतके आणि तीन अर्धशतके ठोकल्याबद्दल बरोटला बीसीसीआयने अंडर-१९ क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कारही दिला होता. २०२०-२१च्या हंगामात, बरोटने सौराष्ट्रसाठी विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक करंडक स्पर्धेत भाग घेतला. त्याने गोव्याविरुद्ध टी-२० क्रिकेटचे एकमेव शतकही झळकावले. या सामन्यात, बरोटने फक्त ५३ चेंडूत १२२ धावा केल्या, ज्यात ११ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.