S Sreesanth Banned For 3 Years By KSCA: भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. २००८ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान तो हरभजन सिंग सोबतच्या वादामुळे चर्चेत आला होता. त्यानंतर २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळून आला. त्यामुळे त्याच्यावर बंदी घातली गेली होती. ही बंदी २०२० मध्ये संपली. त्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमबॅक केलं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं. सध्या तो कुठल्याही प्रकारचं क्रिकेट खेळत नाही. मात्र तरीदेखील त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या.

एस श्रीसंत संजू सॅमसनमुळे अडचणीत सापडला आहे. फेब्रुवारी महिन्यात दुबईमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार रंगला. या स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेसाठी संजू सॅमसनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता. त्यावेळी श्रीसंतने केरळ क्रिकेट असोसिएशनवर निशाणा साधला होता. श्रीसंतने केरळ क्रिकेट असोसिएशनबद्दल बोलताना अपमानजनक वक्तव्य केले होते. त्यामुळे केरळ क्रिकेट असोसिएशनने श्रीसंतवर कारवाई केली आहे. हा निर्णय ३० एप्रिल रोजी कोचीमध्ये झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला आहे.

श्रीसंतने एकदा मल्याळम टीव्ही चॅनलवरील एका चर्चेत सहभाग घेतला होता. त्यावेळी त्याने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्याला अलाप्पुझा टीम लीड, कोल्लम एरिज आणि अलाप्पुझा रिपल्स यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. श्रीसंत हा सध्या केरळ क्रिकेट लीग स्पर्धेत कोल्लम एरीज संघाचा सहमालक आहे. नोटीस बजावल्यानंतर तिन्ही संघांनी उत्तर दिली आहेत. त्यामुळे केरळ क्रिकेट असोसिएशनने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

यासह केरळ क्रिकेट असोसिएशनने श्रीसंतला नोटीस बजावण्यामागचं कारण देखील स्पष्टपणे सांगितलं आहे. श्रीसंतने संजू सॅमसनला पाठिंबा दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली नाही, तर त्याने केरळ क्रिकेट असोसिएशनविरूद्ध दिशाभूल करणारे वक्तव्य केले असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

एस श्रीसंतची क्रिकेट कारकि‍र्द

एस श्रीसंतच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघाला २००७ टी-२० वर्ल्डकप आणि २०११ चा वनडे वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्याच्या टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १० सामन्यांमध्ये ७ गडी बाद केले आहेत. ५३ वनडे सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना त्याने ७५ गडी बाद केले आहेत. तर कसोटी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २७ सामन्यांमध्ये ८७ गडी बाद केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.