भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना पुण्यात खेळला जात आहे. या सामन्यात राहुल त्रिपाठीने भारताकडून पदार्पण केले, तर अर्शदीप सिंग पहिल्या सामन्यात आजारातून बरा झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला. मात्र, त्याचे पुनरागमन खूपच खराब झाले. गतवर्षी भारताच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या अर्शदीप सिंगने या सामन्यात केवळ दोनच षटके टाकली आणि यादरम्यान तो खूपच महागडा ठरला. त्याने एकट्याने या सामन्यात एकूण ५ नो-बॉल टाकले. अर्शदीपने लागोपाठ अनेक नो-बॉल टाकल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याही खूप नाराज दिसला आणि १९व्या षटकात अर्शदीपची विकेट पडल्यानंतर अंपायरने नो-बॉल दिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

डावाच्या १९व्या षटकात त्याने धोकादायक फलंदाजी करणाऱ्या दासुन शनाकाला बाद केले. चौथ्या चेंडूवर शनाकाने लेन्थ मारला, पण चेंडू थेट लाँग ऑनवर उभ्या असलेल्या सूर्यकुमारच्या हातात गेला. मात्र, नो-बॉलचा हूटर वाजताच सूर्यकुमारसह हार्दिकचा चेहरा पडला. कारण नो-बॉलमुळे शनाका वाचला. कर्णधार हार्दिकने निराशेने आपला चेहरा हाताने झाकून घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामन्यानंतर भारतीय कर्णधार म्हणाला, “बॉलिंग आणि बॅटिंग पॉवरप्ले दोन्ही आम्हाला महागात पडले. आम्ही मूलभूत चुका केल्या ज्या आम्ही या टप्प्यावर करू नयेत. शिकणे हे मूलभूत गोष्टींबद्दल असले पाहिजे ज्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. तुमचा दिवस वाईट असू शकतो परंतु मूलभूत गोष्टींपासून दूर जाऊ नका. या परिस्थितीत हे खूप कठीण आहे. यापूर्वीही त्याने (अर्शदीप सिंग) नो-बॉल टाकला होता. हे दोष देण्याबद्दल नाही तर नो बॉलचा गुन्हा आहे.”

पुणे टी२० मध्ये नवोदित राहुल त्रिपाठीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली, ज्यामुळे सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर खेळावे लागले. सामन्यात सूर्या पहिल्या टी२० मध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. फलंदाजीच्या क्रमातील या बदलाबद्दल बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला की, “जो कोणी संघात येतो तुम्हाला त्यांना अशी भूमिका द्यायची आहे ज्यामध्ये ते त्यांचे काम व्यवस्थितपणे पारू पाडू शकतील, सूर्याने चौथ्या क्रमांकावर शानदार धावा केल्या आहेत.”

हेही वाचा: IND vs SL 2nd T20: अक्षर-सूर्याची झुंजार खेळी अपयशी! श्रीलंकेची भारतावर १६ धावांनी मात, मालिकेत १-१ अशी बरोबरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, कर्णधार दासून शनाका आणि कुशल मेंडिसच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात ६ गडी बाद २०६ धावा केल्या. केवळ २२ चेंडूत सहा षटकार आणि दोन चौकारांसह नाबाद ५६ धावा खेळण्याबरोबरच शनाकाने चमिका करुणारत्ने (नाबाद ११) सोबत चार षटकांत ६८ धावांची अभेद्य भागीदारी करून संघाची धावसंख्या २०० धावांच्या पुढे नेली. मेंडिसने याआधी ३१ चेंडूत चार षटकार आणि तीन चौकारांसह ५२ धावा केल्या आणि पाथुम निसंका (३३) सोबत पहिल्या विकेटसाठी ८.२ षटकांत ८० धावांची जलद भागीदारी केली. चरित अस्लंकानेही १९ चेंडूंत चार षटकारांसह ३७ धावांची दमदार खेळी केली.