विजयासाठी १२, बरोबरीसाठी ६ आणि अनिर्णीत सामन्यासाठी ४ गुण

पीटीआय, दुबई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पध्रेसाठी बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नवी गुणपद्धती जाहीर केली आहे. त्यानुसार कसोटी सामना जिंकल्यास १२ गुण मिळतील, अनिर्णीत राहिल्यास ४ गुण दिले जातील, तर बरोबरीत (टाय) झाल्यास प्रत्येकी ६ गुण बहाल करण्यात येतील.

२०२१-२३ या वर्षांसाठी क्रमवारी ठरवताना गुणांची टक्केवारी गृहीत धरणार असून, ‘आयसीसीकडून ऑगस्ट महिन्या तपासून सुरू होणाऱ्या भारत-इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ही नवी गुणपद्धती लागू करण्यात येणार आहे. जून २०२३पर्यंतच्या या मुदतीत अ‍ॅशेस ही एकमेव पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा पुढील वर्षी भारत दौऱ्यावर चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

पहिल्या जागतिक कसोटी स्पध्रेत प्रत्येक मालिकेसाठी १२० गुण दिले जायचे. त्यामुळे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रत्येक विजयासाठी ६० गुण संघाला मिळायचे, तर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रत्येक सामन्यासाठी २४ गुण मिळायचे. गुणांच्या या असमानतेवर टीका झाल्यामुळे दुसऱ्या जागतिक कसोटीसाठी नवी गुणपद्धती लागू होईल, असे संकेत ‘आयसीसी’ने दिले होते. कसोटी क्रिकेटचा दर्जा असलेले नऊ संघ प्रत्येकी सहा मालिका खेळणार असून, यापैकी तीन मायदेशात व तीन परदेशात असतील.

भारतात श्रीलंका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाशी कसोटी मालिका

दुबई : जागतिक कसोटी स्पध्रेत भारताने पुन्हा पाकिस्तानशी खेळायचे टाळले आहे. भारतीय संघ नियोजित मुदतीत श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाशी मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे, तर इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc new criteria for world test title ssh
First published on: 15-07-2021 at 01:11 IST