दुबई : बांगलादेशातील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिलांची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.ही स्पर्धा ३ ते २० ऑक्टोबर या कालावधीत रंगणार असून सामने दुबई आणि शारजा येथे खेळवले जातील. ‘‘महिलांची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा बांगलादेशऐवजी अन्यत्र खेळवावी लागणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, आता अमिराती येथे ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडेल याची मला खात्री आहे,’’ असे ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अॅलर्डाइस म्हणाले.

हेही वाचा >>> कर्णधारपदामागे धावू नकोस! पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीचा बुमराला सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधातील नागरिकांच्या तीव्र उद्रेकामुळे बांगलादेशातील परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे तेथील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीनेही याबाबत चिंता व्यक्त केली. त्यामुळे ‘आयसीसी’ला स्पर्धा अन्यत्र हलविणे भाग पडले. या विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत ‘आयसीसी’ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) विचारणा केली होती. मात्र, त्यांचा प्रस्ताव ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी फेटाळून लावला होता. त्यानंतर श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांनी या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची तयारी दर्शवली होती. परंतु ‘आयसीसी’ने आयोजनाचा मान संयुक्त अरब अमिरातीला दिला आहे. त्याच वेळी भविष्यात बांगलादेशात जागतिक दर्जाची स्पर्धा आयोजित करण्याची आपल्याला आशा असल्याचेही ‘आयसीसी’ने म्हटले आहे.