मागच्या काही वर्षात आयपीएलमुळे क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. या स्पर्धेमुळे क्रिकटपटूंवर पैशांचा वर्षाव होऊ लागला आहे. २००८ मध्ये आयपीएल सुरु झाल्यानंतर क्रिकेटपटूंच्या आयुष्यात बदल दिसू लागला आहे. आयपीएलनंतर जगभरात अशा प्रकारात अनेक स्पर्धा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे चांगल्या खेळाडूंसाठी फ्रेंचाइसी चांगली किंमत मोजत आहेत. आयपीएलमुळे नवख्या खेळाडूंना आपली कामगिरी दाखवण्याची संधी मिळाली आहे. हार्दिक पंड्यानेही आपलं कौशल्य आयपीएलमध्ये दाखवलं आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने आपली अष्टपैलू कामगिरी सिद्ध करून दाखवली आहे. आयपीएलमध्ये लिलावातून मिळणाऱ्या पैशांबाबत अष्टपैलू हार्दिक पंड्याने आपलं मत व्यक्त केलं आहे. "काय चाललंय हे समजण्यासाठी चांगल्या बुद्धिमत्तेची गरज आहे. मी आणि कृणाल दोघेही सक्षम होतो. तिथे पैसा आहे, पण पाय जमिनीवर असणं गरजेचं आहे. कधी कधी खूप हवेत आहे, असं वाटतं. पण दिवसाच्या शेवटी माझे पाय जमिनीवर असतात. पैसा असणं चांगली बाब आहे. त्यामुळे सर्व बाबी बदलत असतात. मी स्वत: एक उदाहरण आहे. नाही तर आज मी पेट्रोल पंपावर दिसलो असतो. मी मस्करी करत नाही. माझ्याासाठी माझे कुटुंब प्राथमिकता होती.कुटुंबीयांचं जीवन कसं चांगलं राहील यासाठी प्रयत्न होता", असं हार्दिक पंड्याने क्रिकेट मंथलीशी बोलताना सांगितलं. त्याचबरोबर क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन आणि प्रेरणा मिळण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे, असंही त्याने पुढे सांगितलं. "खूप साऱ्या ऑफर्समुळे खेळाडून चांगलं प्रदर्शन करण्यासाठी भावुक होतात. कारण मिळणाऱ्या पैशातून कुटुंबीयांचं जीवन बदलतं. पैसा मिळतो म्हणून लोकं क्रिकेट खेळतात. अन्यथा लोकांनी क्रिकेट खेळणं सोडलं असतं. २०१९ मध्ये माझं एका व्यक्तीशी बोलणं झालं. तो सांगत होता, की तरूण खेळाडूंनी पैशांचा मागे धावू नये. मी त्यांच्या त्या विधानाशी असहमत होतो. जेव्हा गाव आणि छोट्या शहरातील तरूणांना मोठा करार मिळतो. तर ते स्वत:साठी ठेवत नाहीत. ते आपल्या आई-वडिलांची देखभाल करतात. कुटुंबीयांना त्यांची मदत होते. पैशांमुळे फरक पडतो आणि तेथून प्रेरणा देखील मिळते. लोकांनी पैशांबद्दल बोलू नये, हा चुकीचा समज आहे. खेळ आणि पैसा याप्रकरणी लोकं भावुक होतात, मी यावर विश्वास ठेवत नाही. पैसा नसता तर आज किती लोकं क्रिकेट खेळले असते, हे सांगता येत नाही", असंही हार्दीक पंड्याने पुढे सांगितलं. हार्दिक पंड्या टी २० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा सदस्य आहे. मात्र अजूनही त्याला सूर गवसलेला नाही. आयपीएलमध्ये त्याने गोलंदाजी केली नाही. त्यामुळे सराव सामन्यात हार्दिक चांगली कामगिरी करेल, अशी आशा कर्णधार विराट कोहलीला आहे. २४ ऑक्टोबरला भारताचा प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत सामना आहे. या सामन्यापूर्वी हार्दिक पंड्या फिट व्हावा, अशी क्रिकेटप्रेमींना आशा आहे.