टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बऱ्याच दिवसांपासून फॉर्ममध्ये नाही. रोहित गेल्या वर्षी टीम इंडियाचा कर्णधार झाला तेव्हापासून त्याची बॅट फारशी चांगली खेळत नव्हती. सध्याच्या टी२० विश्वचषकात रोहितचा फॉर्मही चिंतेचा विषय ठरला आहे. भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी रोहितच्या खराब फॉर्मवर मोठे वक्तव्य केले आहे.

रोहित शर्माच्या फलंदाजीवर सुनील गावसकरांचे खडेबोल

रोहित शर्माने भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून, सलामीवीर म्हणून त्याचे काम पॉवरप्लेमध्ये लवकर गोलंदाजांवर हल्ला करणे आणि उर्वरित फलंदाजांसाठी पाया घालणे हे आहे. पण सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात रोहितला पॉवर-प्लेमध्ये भारतासाठी मोठी सुरुवात करता आलेली नाही. भारतीय संघ आता उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला असला तरी, रोहितचा फॉर्म चिंतेचा विषय असेल, त्याने अवघ्या पाच सामन्यांत १७ च्या सरासरीने ८९ धावा केल्या.

भारताचे माजी दिग्गज सुनील गावसकर म्हणाले, “रोहित सलामीला फलंदाजी करत असताना त्याला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश येत आहे. डावाची सुरुवात झाल्यानंतर तो लगेच बाद होत असल्याने भारतीय संघ अडचणीत येत आहे. गोलंदाजांना देखील त्याला बाद करणे हे सोपे झाले आहे.” गावस्कर पुढे म्हणाले, “पण संघाचा कर्णधार म्हणून पहिल्या ६ षटकांमध्ये धमाकेदार सुरुवात करून देण्याची जबाबदारी ही सलामीवीरांची असून त्याची ब्ल्यू प्रिंट रोहितनेच तयार केली आहे. तो चेंडू इकडे तिकडे फिरवताना, खराब फटका मारताना फारसा दिसत नाही. तो नेहमी योग्य चेंडूवर फटका मारतो. पण तो पुल शॉट ऑस्ट्रेलियन मैदानावर मारताना मात्र थोडा तो अडचणीत येतो कारण येथील मैदाने आणि चेंडूची उसळी ही इतर देशातील खेळपट्ट्यांपेक्षा वेगळी आहे.”

हेही वाचा :   T20 World Cup Finals: BCCI च्या अध्यक्षांसहीत जय शाह फायनल्स पाहायला ऑस्ट्रेलियाला जाणार; उपांत्य फेरीआधीच निर्णय

पुल शॉटवर होतोय बाद

गावसकर म्हणाले, “आम्ही पाहिले की दोन वर्षांपूर्वी तो पुल शॉट्स खेळून (कसोटीमध्ये) ४०-५० धावा करून दोनदा बाद झाला होता.  आता याच पुल शॉट्समुळे तो पुन्हा अडचणीत आला आहे. टी२० फॉरमॅटमधील पहिल्या सहा षटकांमध्ये रोहितने क्षेत्ररक्षक पाहून काळजी घेऊन पुल शॉट खेळला पाहिजे.” रविवारी एमसीजीमध्ये अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी भारत आता गुरुवारी उपांत्य फेरीत इंग्लंडशी भिडणार आहे, गावसकर यांनी आशा व्यक्त केली की, “रोहित फलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करेल आणि इंग्लंडविरुद्ध ९ वर्षांचा बदला घेण्याची संधी सर्व भारतीयांना देईल अशी मला आशा आहे.”

हेही वाचा :   T20 World Cup: सूर्यकुमारचा फटका आणि विराटबाबत बेन स्टोक्सचे वक्तव्य, पाहा इंग्लिश अष्टपैलू खेळाडू काय म्हणाला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आता हे बाद फेरीचे टप्पे आहेत. बाद फेरीत तुम्हाला जास्त प्रयोग करणे योग्य नाही. तुम्ही तुमचे सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करणे आवश्यक आहे. रोहित जे काही करतो, ते संघासाठी चांगले आणि दिशादर्शक असेन अशी आशा करूया. स्वतः च्या फलंदाजीत अधिक बदल करण्याची गरज नाही.” असे गावसकर म्हणाले.