भारताविरुद्ध कानपूर कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या शेवटच्या मिनिटात न्यूझीलंड संघाला मोठा फटका बसला. २८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी विल यंग आणि टॉम लॅथम मैदानात उतरले. रवीचंद्रन अश्विनने पायचीतचे अपील केल्यावर पंचांनी विल यंगला आऊट दिले. यानंतर यंगने त्याचा साथीदार लॅथमसोबत चर्चा केली, परंतु यादरम्यान रिव्ह्यूसाठी १५ सेकंदांचा कालावधी लोटला होता. त्यामुळे फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. महत्त्वाचे म्हणजे यंग नाबाद होता.

किवी संघाच्या दुसऱ्या डावातील तिसरे षटक अश्विन टाकत होता आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ही घटना घडली. चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने वळला आणि फलंदाज विल यंगच्या पायाला लागला. यावर भारताकडून जोरदार अपील करण्यात आले आणि अंपायरने फलंदाजाला आऊट दिले. यंगने नॉन स्ट्राइकवर उभा असलेला सहकारी फलंदाज लॅथमला रिव्ह्यूबाबत विचारले. त्यांची चर्चा चालली आणि १५ सेकंद उलटले. फलंदाजाने रिव्ह्यूसाठी इशारा केला पण त्याला सांगण्यात, आले की वेळ निघून गेली आहे आणि तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. तुम्हाला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागेल.

हेही वाचा – किती रोमँटिक..! विराटनं शेअर केला अनुष्कासोबतचा ‘खास’ फोटो; म्हणाला, “जेव्हा तू माझ्यासोबत असतेस…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फलंदाज यंग पॅव्हेलियनमध्ये गेला, पण रिप्लेमध्ये पाहिले तेव्हा तो नाबाद होता. चेंडू वळल्यानंतर तो लेग स्टंप सोडून बाहेर जात होता. फलंदाजाने योग्य वेळी रिव्ह्यू घेतला असता तर न्यूझीलंड संघाची एकही विकेट गेली नसती. भारतीय संघाने दुसरा डाव ७ बाद २३४ धावांवर घोषित केला. किवी संघाला २८४ धावांचे लक्ष्य मिळाले. दिवसअखेर न्यूझीलंडने १ गडी बाद ४ धावा केल्या आहेत. त्यांना आता पाचव्या दिवसाच्या खेळात २८० धावा कराव्या लागणार आहेत. हा सामना रंजक होण्याची अपेक्षा आहे.