India vs Sri Lanka, Asia Cup 2023: आशिया कप २०२३ सुपर-४ सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे खेळला गेला, या सामन्यात टीम इंडियाने ४१ धावांनी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, यादरम्यान सामना सुरु असताना भारत आणि श्रीलंकाचे चाहते एकमेकांना भिडले आहेत. वास्तविक, श्रीलंकेच्या पराभवानंतर लंकेचे चाहते संतापले होते. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारत आणि श्रीलंकेच्या चाहत्यांमध्ये बाचाबाची झाली.

भारतीय संघाने सुपर-४च्या चौथ्या सामन्यात श्रीलंकेचा रोमहर्षक पराभव केला असून, त्यानंतर संघ थेट अंतिम फेरीत पोहोचला आहे. पण श्रीलंकेच्या या पराभवामुळे लंकेचे चाहते चांगलेच संतापले, त्यानंतर भारत आणि लंकेच्या चाहत्यांमध्ये हाणामारी झाली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की, एक लंकन चाहता भारतीय चाहत्यांजवळ कसा जातो आणि भांडायला लागतो, त्यानंतर दोन्ही लोक एकमेकांना धक्काबुक्की करतात, त्याचे रुपांतर हाणामारीत होते.

पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध सलग दोन विजय

भारतीय संघाने सुपर-४ मध्ये पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता, जो त्याने २२८ धावांनी जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संघाला श्रीलंकेविरुद्ध सामना खेळायचा होता. टीम इंडियाने श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव करत सुपर-४ मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. मात्र, टीम इंडियाने पाकिस्तान आणि श्रीलंकेला हरवून अंतिम फेरी गाठली आहे.

श्रीलंकेविरुद्धचा सामन्यात काय झाल?

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने प्रथम फलंदाजी करताना ४९.१ षटकांत सर्वबाद २१३ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव १७२ धावांवरच मर्यादित राहिला आणि ४१ धावांनी सामना गमावला. कर्णधार रोहित शर्माने (५३) या सामन्यात केवळ एक ५० पेक्षा जास्त धावसंख्या बनवली होती. या सामन्यात फिरकीपटूंचे वर्चस्व होते आणि फिरकीपटूंनी श्रीलंका आणि भारताच्या दहा विकेट्स घेतल्या.

हेही वाचा: Kuldeep Yadav: कुलदीपने श्रीलंकेविरुद्धच्या शानदार गोलंदाजीमागील उलगडले गुपित; म्हणाला, “के.एल. राहुलने मला…”

भारतासोबत फायनल कोण खेळणार?

गुरुवारी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. हा सामना दोन्ही संघांचे स्पर्धेतील भवितव्य ठरवेल. त्याचबरोबर, सुपर-४ टप्प्यातील श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना आहे. कोलंबो येथे होणाऱ्या सामन्यात श्रीलंका आपल्या घरच्या मैदानाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. मात्र, आतापर्यंत येथे झालेल्या सुपर-४ सामन्यात पावसाने खोडा घातला आहे.

श्रीलंका-पाक सामना रद्द झाल्यास काय शक्यता असतील?

आतापर्यंत कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवरील सामन्यांना पावसामुळे अडचणींचा सामना करावा लागला होता. कोलंबोमध्येही आणखी पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांचा धावगतीवर हा निर्णय होईल. आतापर्यंत श्रीलंका या बाबतीत पाकिस्तानच्या पुढे आहे. जर पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघानंतर श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा: Kuldeep Yadav: श्रीलंका-पाकिस्तान सामन्यात कुलदीपने रचला इतिहास, १५० विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज; म्हणाला, “निवृत्तीनंतर मी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय संघ सुपर-४ टप्प्यातील दोन्ही सामने जिंकून ४ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे श्रीलंकेने दोनपैकी एक सामना जिंकला आहे आणि एक पराभव पत्करला आहे. श्रीलंका २ गुण आणि -०.२०० निव्वळ धावगतीने दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पाकिस्तान संघाने दोनपैकी एक सामना जिंकला असून एक पराभव पत्करला आहे. पाकिस्तानचा निव्वळ धावगती -१.८९२ असून संघ तिसऱ्या स्थानावर आहे.