श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने अर्धशतक ठोकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम ऋषभ पंतने केला आहे. पंतने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. पंतने अवघ्या २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.

बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने अवघ्या २८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आपल्या खेळीदरम्यान पंतने ७ चौकार आणि २ षटकार मारले.

त्यामुळे आता भारतातर्फे वेगवान अर्धशतक करणाऱ्यांच्या यादीत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. कपिल देव यांनी १९८२ मध्ये कराचीमध्ये पाकिस्तानविरुद्ध ३० चेंडूत अर्धशतक ठोकले होते. तर शार्दुल ठाकूरने २०२१ मध्ये ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध ३१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. चौथ्या क्रमांकावर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आहे, ज्याने २००८ मध्ये चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध ३२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हकच्या नावावर आहे. ज्याने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ चेंडूत हे स्थान मिळवले होते. तर भारतीय मैदानावर सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदीने २००५ मध्ये बंगळुरूमध्ये भारताविरुद्ध २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. इयान बोथमने १९८१ मध्ये भारताविरुद्ध २८ चेंडूत अर्धशतक केले होते. या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पंतला आपला डाव जास्त पुढे नेता आला नाही. ३० चेंडूत ५० धावा करून तो बाद झाला. त्यावेळी भारताची धावसंख्या पाच गडी बाद १८४ अशी होती. पंतने १५६.१४च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले.