कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजवर मात केली. विंडीजने विजयासाठी दिलेले ३१६ धावांचे आव्हान भारताने ४ गडी राखून पूर्ण केले. २०१९ वर्षातला भारताचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता, त्यामुळे वर्षाची अखेर भारताने २-१ अशी मालिका विजयाने केली.

तिसऱ्या सामन्यात २८ व्या षटकात अल्झारी जोसेफ गोलंदाजी करत होता. त्यावेळी जोसेफने टाकलेला चेंडू राहुलच्या पायाजवळ टप्पा पडला. राहुलने झोकात तो चेंडू टोलवला. धोनी ज्या प्रकारे हेलिकॉप्टर शॉट खेळतो, त्या प्रकारेच, पण बाजूच्या दिशेने राहुलने बॅट फिरवत चेंडू टोलवला. या शॉटनंतर त्या फटक्याला मिनी हेलिकॉप्टर शॉट म्हटले जात आहे.

हा पहा व्हिडीओ –

असा रंगला तिसरा सामना

प्रथम फलंदाजी करताना निकोलस पूरन आणि कर्णधार कायरन पोलार्ड यांच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ३१५ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये टिच्चून मारा केला. शे होप, एविन लुईस, रॉस्टन चेस आणि हेटमायर यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. पण अखेरच्या षटकांमध्ये पूरन आणि पोलार्ड जोडीने फटकेबाजी करत संघाला ३०० पार पोहोचवले. पूरनने ८९ तर पोलार्डने नाबाद ७४ धावा केल्या. सैनीने २ तर जाडेजा, शार्दुल आणि शमीने १-१ बळी टिपला.

विंडीजने विजयासाठी दिलेल्या ३१६ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात आक्रमक झाली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतके झळकावली. राहुलने ७७ तर रोहितने ६३ धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर, केदार जाध आणि ऋषभ पंत स्वस्तात माघारी परतले. पण विराटने एक बाजू लावून धरत रविंद्र जाडेजाच्या साथीने भारताचा डाव सावरला. विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना विराट त्रिफळाचीत झाला. ८५ धावांवर त्याला माघारी परतावे लागले. यानंतर रविंद्र जाडेजा आणि मुंबईकर शार्दुल ठाकूर या दोघांनी योग्य वेळी फटकेबाजी करत भारताला विजय मिळवून दिला.