निर्णायक कसोटीत आफ्रिकेचा ७ गडी राखून विजय; भारताने मालिका १-२ अशी गमावली पीटीआय, केप टाऊन तारांकित क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाने शुक्रवारी तिसऱ्या कसोटी सामन्यात खडतर स्थित्यंतरातून जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेकडून सात गडी राखून पराभव पत्करला. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आफ्रिकन भूमीवर १-२ अशा फरकाने मालिका गमवावी लागली. भारताचे २१२ धावांचे लक्ष्य गाठणे सामन्याच्या चौथ्या दिवशी आफ्रिकेसाठी अवघड नव्हते. २ बाद १०१ धावसंख्येवरून दुसऱ्या डावाला पुढे प्रारंभ केल्यावर त्यांनी जबाबदारीने भारताचे लक्ष्य पार केले. युवा कीगन पीटरसन (११३ चेंडूंत ८२ धावा) आणि रॅसी व्हॅन डर दुसेन (४१ नाबाद) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ५४ धावांची बहुमोल भागीदारी करीत आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला. मग दुसेन आणि तेंबा बव्हुमा (३२ नाबाद) यांनी कळस चढवला. अखेरच्या दोन कसोटी सामन्यांत अपेक्षित प्रतिकार न झाल्यामुळे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी ‘भारताची वणवण’ अशा शब्दांत ताशेरे ओढले. कर्णधार डीन एल्गरविरुद्ध ‘डीआरएस’ वादग्रस्तरीत्या फेटाळल्यानंतर भारतीय संघ मानसिकदृष्टय़ा खचला. यष्टीच्या माइकवर कोहलीसह काही खेळाडूंनी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. त्यामुळे गेली तीन दशके आफ्रिकन भूमीवर मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न अधुरे राहिले. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली २०१० मध्ये भारताने आफ्रिकेत एकमेव मालिका बरोबरीत सोडवली होती. बलवान भारतीय संघ आणि दुबळा आफ्रिकन संघ असे मालिकेआधी दोन्ही संघांविषयी जाणकारांनी म्हटले होते. महत्त्वाचा वेगवान गोलंदाज आनरिख नॉर्किएने दुखापतीमुळे माघार घेतली, तर मालिकेच्या मध्यावर क्विंटन डीकॉकने निवृत्तीचा निर्णय घेतला. या धक्क्यातून सावरत एल्गरने आफ्रिकन संघाची उत्तम मोट बांधली. भारतीय संघ फलंदाजांपेक्षा गोलंदाजांवर अधिक विसंबून राहिला. गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली. पण फलंदाजांचे अपयश भारताच्या पराभवास कारणीभूत ठरले. सकाळच्या सत्रात पीटरसन ५९ धावांवर असताना जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या स्लिपमध्ये झेल सोडला. त्यानंतर मात्र आफ्रिकन संघाच्या फलंदाजांनी आत्मविश्वासाने खेळत भारतीय गोलंदाजांचा रुबाबात सामना केला. शतकाकडे कूच करणाऱ्या पीटरसनचा शार्दूल ठाकूरने त्रिफळा उडवला; पण दुसेन आणि बव्हुमा यांनी आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. संक्षिप्त धावफलक ’ भारत (पहिला डाव) : २२३ ’ दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : २१० भारत (दुसरा डाव) : १९८ दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : ६३.३ षटकांत ३ बाद २१२ (कीगन पीटरसन ८२, रॅसी व्हॅन डर दुसेन नाबाद ४१; शार्दूल ठाकूर १/२२) सामनावीर आणि मालिकावीर : कीगन पीटरसन. ७ आतापर्यंत सात संघांनी भारताविरुद्ध २००हून अधिक धावसंख्येचे लक्ष्य यशस्वी गाठले आहे. आफ्रिकेने सर्वाधिक तीनदा हा पराक्रम केला आहे, तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या संघांनी प्रत्येकी एकदा अशा रीतीने विजय मिळवला आहे.