भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील शेवटच्या दिवशी दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत सुरू आहे. भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी दमदार सुरूवात केली आहे. इंग्लंडकडून बेन डकेट पहिल्या डावात ६४ तर जॅक क्रॉली पहिल्या डावात ४२ धावांवर माघारी परतला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर इंग्लंडला विजयासाठी २५४ धावांची गरज आहे. दरम्यान पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

भारतीय संघाकडून पाचव्या दिवशी गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृ्ष्णा यांनी डावाची सुरूवात केली. दोन्ही फलंदाजांनी बुमराहचं षटक खेळून काढलं आणि इतर गोलंदाजांविरूद्ध फलंदाजी करताना धावा जमा करण्यावर भर दिला. दोन्ही सलामीवीरांनी शार्दुल, प्रसिद्ध आणि सिराजच्या गोलंदाजीवर धावा जमा केल्या.

शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

पाचव्या दिवशी ३० वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला. हे पहिल्या सत्रातील शेवटचे षटक ठरले. हे षटक सुरू होताच ऋषभ पंत मोहम्मद सिराजला म्हणाला की, “एका मिनिटात षटक पूर्ण करू शकतो का?”, सिराजनेही त्याला होकार दिला. कारण पहिले सत्र संपायला जवळपास ८० सेंकद शिल्लक होते. जर सिराजने हे षटक वेळेत पूर्ण केले असते, तर शेवटचे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला असता. इंग्लंडचे फलंदाज जसप्रीत बुमराहसमोर खेळताना अडचणीच सापडत होते. कारण २९ व्या षटकात दोनदा विकेट घेण्याची संधी निर्माण झाली होती.

बुमराह शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला यावा म्हणून ऋषभने शक्कल लढवली. पण, इंग्लंडच्या फलंदाजांनीही डोकं लावलं. सिराज रनअप घेवून धावत आला, तो चेंडू टाकणार इतक्यात क्रॉलीने त्याला थांबायला सांगितलं. त्याने साईट स्क्रीनचं कारण देत वेळ वाया घालवला. त्यामुळे सिराजचे षटक हे पहिल्या सत्रातील शेवटचे षटक ठरले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर बुमराह शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला असता, तर शेवटच्या षटकात विकेट मिळू शकली असती. कारण दोन्ही फलंदाजांना बुमराहचा सामना करायचा नव्हता.