Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद १७४ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार विराट कोहली याने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. त्याने सर्वाधिक ४९ धावा केल्या. शेवटच्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांनी ‘कमबॅक’ करत ५ बळी टिपले. त्यापैकी अँडरसन आणि स्टोक्सने २-२ तर ब्रॉड आणि कुर्रानने १-१ बळी टिपला. सध्या हनुमा विहारी २५ तर जडेजा ८ धावांवर खेळत आहे.
भारताने चहापानापर्यंत १ बाद ५३ धावांपर्यंत मजल मारली होती. यासाठी भारतीय फलंदाजांनी १८ षटके घेतली. भारताला शिखर धवनच्या रूपात पहिला धक्का ६ धावांवर बसला. धवन ३ धावा करून बाद झाला. त्यानंतर राहुल-पुजारा जोडीने भारताच्या डावाला आकार देत अर्धशतकापर्यंत नेले. पण राहुलची अपयशाची मालिका सुरूच राहिली. चांगला खेळ करत असताना ३७ धावांवर तो माघारी परतला. भारताच्या डावाला आकार देण्याच्या दृष्टीने खेळपट्टीवर स्थिरावलेला चेतेश्वर पुजाराही ३७ धावांवर बाद झाला. पाठोपाठ उपकर्णधार रहाणे शून्यावर बाद झाला. या दोन धक्क्यानंतर विराटने भारताला सावरले. त्याच्या झुंजार खेळीमुळे भारताने १५० टप्पा गाठला. मात्र विराटला अर्धशतकाने हुलकावणी दिली. तो ४९ धावांवर बाद झाला. नंतर ऋषभ पंतही बाद झाला.
त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव सर्वबाद ३३२ धावांवर संपला. जोस बटलर याच्या ८९ धावांच्या बळावर इंग्लंडला या डावात त्रिशतकी मजल मारता आली. ७ बाद १९८ या धावसंख्येवरून इंग्लंडने डावाला आज सुरुवात केली. त्यांनतर पहिल्या सत्रात भारताला केवळ १ गडी बाद करता आला आहे. आदिल रशीदच्या (१५) रूपाने बुमराहने भारताला यश मिळवून दिले. तळाच्या फलंदाजांना झटपट बाद करून इंग्लंडचा डाव लवकर संपवण्याचा भारतीय गोलंदाजांचा मानस होता. पण त्यांच्या या मनसुब्यांवर बटलर-ब्रॉड जोडीने पाणी फेरले. जोस बटलरने खेळपट्टीवर पाय रोवून अर्धशतक ठोकले. तर ब्रॉडनेदेखील त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे इंग्लंडने उपहारापर्यंत त्रिशतकी मजल मारली. दुसऱ्या सत्रात मात्र भारताच्या गोलंदाजाना अखेर लय सापडली. रवींद्र जडेजाने या सत्रात आधी ब्रॉड तर नंतर बटलरला बाद केले. भारताकडून जडेजाने ४, तर इशांत शर्मा आणि बुमराहने ३-३ बळी टिपले.
तत्पूर्वी पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने कासवाच्या गतीने खेळ करत ७ बाद १९८ धावा केल्या. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात इंग्लंडने सामन्यावर पकड मिळवली होती. पण चहापानानंतर मात्र भारताने सहा बळी टिपत इंग्लंडला संकटात टाकले. इंग्लंडकडून आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या कुकने सर्वाधिक ७७ आणि मोईन अलीने ५० धावा केल्या.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद १७४ धावांपर्यंत मजल मारली. शेवटच्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांनी ‘कमबॅक’ करत ५ बळी टिपले. त्यापैकी अँडरसन आणि स्टोक्सने २-२ तर ब्रॉड आणि कुरानने १-१ बळी टिपला. सध्या हनुमा विहारी २५ तर जडेजा ८ धावांवर खेळत आहे.
कर्णधार कोहली बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि हनुमा विहारी या नवख्या जोडीवर भारताची मदार होती. पण ऋषभ पंतने बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका खेळत स्लिपमध्ये झेल दिला. या बरोबरच भारताचा सहावा गडी माघारी परतला असून पंत ५ धावांवर बाद झाला.
स्थिरावलेला पुजारा आणि लगेच बाद झालेला उपकर्णधार रहाणे यांच्या धक्क्यानंतर विराटने भारताला सावरले. त्याच्या झुंजार खेळीमुळे भारताने १५० टप्पा गाठला, मात्र विराटला अर्धशतकाने हुलकावणी दिली. विराट ४९ धावांवर बाद झाला. बेन स्टोक्सने त्याला तंबूत धाडले.
पदापर्णचा सामना खेळणाऱ्या हनुमा विहरीला शून्यावर असताना पंचांनी बाद ठरवले होते. पण DRSने त्याला नामुष्कीपासून वाचवले. DRSच्या रिव्ह्यूमध्ये त्याला नाबाद ठरवण्यात आले. तब्बल १९ वर्षांनंतर भारतीय संघात त्याच्या रूपाने एका आंध्र प्रदेशच्या खेळाडूला स्थान मिळाले आहे. त्यामुळे त्याच्याकडून साऱ्यांनाच खूप अपेक्षा आहेत.
चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे कडून भारताला अपेक्षा होत्या. मात्र त्याला कर्णधार विराट कोहलीला साथ देता नाही. ७ चेंडूत ० धावा करून तो माघारी परतला. अँडरसनने डावातील दुसरा बळी घेण्यात यश मिळवले.
भारतीय संघाला आकार देण्याच्या दृष्टीने खेळपट्टीवर स्थिरावलेला चेतेश्वर पुजारा ३७ धावांवर बाद झाला. अँडरसनने त्याला उत्कृष्ट चेंडू फेकत बाद केले. बाद होण्याआधी बरेच चेंडू बॅटला लावण्याचा पुजारा प्रयत्न करत होता, पण त्याला चेंडू समजत नसल्याचे दिसत होते.
राहुल-पुजारा जोडीने भारताच्या डावाला आकार देत अर्धशतकापर्यंत नेले. पण राहुलची अपयशाची मालिका सुरूच राहिली. चांगला खेळ करत असताना ३७ धावांवर तो माघारी परतला. कुर्रानने त्याला त्रिफळाचित केले.
भारताने चहापानापर्यंत १ बाद ५३ धावांपर्यंत मजल मारली असून यासाठी भारतीय फलंदाजांनी १८ षटके घेतली आहेत. धवन ३ धावा करून बाद झाल्यानंतर राहुल-पुजारा जोडीने भारताच्या डावाला आकार देत अर्धशतकापर्यंत नेले. सध्या राहुल ३५ तर पुजारा १५ धावांवर खेळत आहे.
सलामीवीर शिखर धवन बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजांनी सावध पवित्रा स्वीकारला आहे. राहुल आणि पुजारा हे संयमी खेळ करून डावाला आकार देण्याचा प्रयत्न करत आहेत. ८ षटकात भारताने १ बाद ३० ही धावसंख्या गाठली आहे.
इंग्लंडचा पहिला डाव ३३२ धावांवर संपल्यानंतर भारताच्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. डावखुरा फलंदाज शिखर धवन ३ धावांवर तंबूत परतला आणि भारताला पहिला धक्का बसला. स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेला चेंडू शिखर धवनला समजला नाही आणि तो पायचीत झाला.
इंग्लंडचा पहिला डाव सर्वबाद ३३२ धावांवर संपला. जोस बटलरच्या ८९ धावांच्या बळावर इंग्लंडला या डावात त्रिशतकी मजल मारता आली. ‘बर्थ डे बॉय’ बटलरने भारतीय गोलंदाजांना चांगलेच झोडपले. पण अखेर रवींद्र जडेजाने त्याला बाद केले. त्या बरोबरच जडेजाने बळींचा चौकार पूर्ण केला.
रशीद बाद झाल्यानंतर ब्रॉडच्या साथीने बटलरने इंग्लंडला त्रिशतकी मजल मारून दिली. मात्र उपहारानंतर अखेर भारताने हि जोडी फोडली. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर ब्रॉड बाद झाला. ब्रॉडने ५९ चेंडूत ३८ धावांची उपयुक्त खेळी केली.
जोस बटलरच्या झुंजार अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडने उपहारापर्यंत ८ बाद ३०४ धावा केल्या आहेत. पहिल्या सत्रात झटपट गडी बाद करण्याचा भारतीय गोलंदाजांचा डाव बटलर-ब्रॉड जोडीने उधळून लावला. उपहाराची वेळ झाली तेव्हा बटलर ६३ तर ब्रॉड ३६ धावांवर खेळत आहेत.
रशीद बाद झाल्यानंतर भारत इंग्लंडचे शेपूट गुंडाळून डाव संपुष्टात आणेल अशी आशा होती. पण मोक्याच्या क्षणी जोस बटलर याने झुंजार अर्धशतक ठोकले. त्यामुळे इंग्लंडच्या शेपटाने पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांवर भारी पडल्याचा प्रत्यय आला.
७ बाद १९८ या धावसंख्येवरुन आज इंग्लंडचा डाव पुढे सुरु झाला. काही काळ बटलरला साथ दिल्यानंतर अखेर इंग्लंडला आठवा गडी गमवावा लागला. फिरकीपटू आदिल रशीदचा जसप्रीत बुमराने काटा काढला. रशीदने १५ धावा केल्या.