चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी ICC Champions Trophy 2017 भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघ निवडीसाठी देण्यात आलेली मुदती संपवून १३ दिवस उलटल्यानंतर अखेर भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. १ जुनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग, केदार जाधव, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावाची घोषणा भारताच्या निवड समितीकडून करण्यात आली आहे. तर रिषभ पंत, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक यांचा समावेश राखीव खेळाडूंमध्ये करण्यात आला आहे.

सध्या जबरदस्त फॉर्मात असलेल्या गौतम गंभीरला चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी संधी देण्यात आलेली नाही. ‘चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचा संघ निवडताना गौतम गंभीरच्या नावाबद्दल चर्चा करण्यात आली नाही,’ असे निवड समितीने म्हटले. २००७ मधील टी-२० विश्वचषक आणि २०११ मधील विश्वचषक स्पर्धेत गौतम गंभीरने चांगली कामगिरी केली होती. सध्यादेखील गंभीर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. मात्र गंभीरच्या नावाचा विचार निवड समितीने केलेला नाही.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताचा पहिला सामना ४ जूनला पाकिस्तानविरुद्ध होईल. आयसीसीला २५ एप्रिलपर्यंत संघाची यादी पाठवायची होती. मात्र आयसीसीसोबत महसूल वाटपाच्या प्रमाणावरुन वाद सुरु असल्याने बीसीसीआयने भारतीय संघाची निवड वेळेवर केली नाही. यानंतर रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत आयसीसीसोबतच्या कोणत्याही वादात न पडता चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेण्यात आला.