पीटीआय, लंडन
लहान देशांना अधिक सामने आणि प्रदीर्घ मालिका खेळता याव्यात या उद्देशाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२७-२९च्या चक्रापासून चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना मंजुरी देण्याची तयारी दर्शविली आहे. नव्या जागतिक अजिंक्यपद कसोटी सामन्यांचे चक्र मात्र पाच दिवसांच्याच सामन्याचे असेल. यामध्ये कमी कालावधीच्या मालिकांवर भर देण्यात आला आहे. नव्या चक्राची सुरुवात मंगळवारपासून श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याने झाली. ही मालिका श्रीलंकेत होत आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान लॉर्ड्स येथे झालेल्या बैठकीत ‘आयसीसी’ अध्यक्ष जय शहा यांनी २०२७-२९ मधील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या मालिकेत चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना पाठिंबा दर्शविल्याचे समजते. अर्थात, इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान होणाऱ्या अॅशेस, बॉर्डर-गावस्कर आणि अँडरसन-तेंडुलकर करंडकासाठी होणाऱ्या मालिका या पाच दिवसांच्या राहणार आहेत. यामधील अँडरसन-तेंडुलकर करंडकासाठी होणारी पहिली मालिका शुक्रवारी हेडिंग्ले येथे सुरू होईल.
दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यांपासून दूरच
दक्षिण आफ्रिका संघाने यंदा ऑस्ट्रेलियाला हरवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळविले असले, तरी त्यांच्या एकूण सामन्यांचा प्रवास लक्षात घेतल्यावर चर्चेदरम्यान या चार दिवसांच्या सामन्याचा मुद्दा ऐरणीवर आला. नव्या चक्रात फार काही वेगळे नाही. विजेतेपदानंतर दक्षिण आफ्रिका सर्वप्रथम नोव्हेंबर महिन्यात दोन सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहे. मात्र, मायदेशात कसोटी खेळण्यासाठी त्यांना ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
अधिक मालिकांची शक्यता
‘आयसीसी’ने यापूर्वी २०१७ मध्ये सर्वप्रथम चार दिवसांच्या द्विपक्षीय मालिकेस मान्यता दिली होती. त्यानुसार इंग्लंड २०१९ आणि २०२३ मध्ये आयर्लंडविरुद्ध आणि गेल्या महिन्यात झिम्बाब्वेविरुद्ध चार दिवसांचा कसोटी सामना खेळले होते. चार दिवसांच्या सामन्यांना जागतिक कसोटी मालिकेच्या कार्यक्रमात जोडून घेणे हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यामुळे लहान देशांमध्ये अधिक मालिका खेळल्या जाऊ शकतील असे ‘आयसीसी’ला वाटते. या बदलांमुळे लहान देश कसोटी क्रिकेट सामन्यांकडे आकर्षित होऊ शकतात असे ‘आयसीसी’चे म्हणणे आहे. अधिक दिवस आणि यामुळे होणारा वाढीव खर्च लक्षात घेता अनेक लहान देश कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यास नाखूश आहेत. मात्र, चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना मंजुरी मिळाल्यावर तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळविली जाऊ शकेल. चार दिवसांचे सामने करताना खेळाचे तास वाढविण्याचा विचार सुरू असून, दिवसाला ९० षटकांऐवजी किमान ९८ षटकांचे सामने खेळविले जाण्याची शक्यता आहे.
नव्या चक्रात २७ कसोटी मालिका
जागतिक अजिंक्यपद कसोटी मालिकेच्या २०२५-२७च्या नव्या चक्रात नऊ देशांमध्ये २७ कसोटी मालिका होतील. यातील १७ मालिका दोन सामन्यांच्या होतील. सहा मालिका तीन सामन्यांच्या असतील आणि इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व भारत हे तीन देश एकमेकांविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची एक मालिका खेळतील.
दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी
जागतिक कसोटी अजिंक्यपद मिळविल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाची ‘आयसीसी’ क्रमवारी सुधारली असून, त्यांनी इंग्लंडला मागे टाकून दुसरे स्थान मिळविले आहे. ऑस्ट्रेलिया १२३ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. दक्षिण आफ्रिकेचे ११४ गुण आहेत. इंग्लंड (११३), भारत (१०५), न्यूझीलंड (९५) हे अन्य देश पहिल्या पाच संघांत आहेत. त्यानंतर अनुक्रमे श्रीलंका (८७), पाकिस्तान (७८), वेस्ट इंडिज (७३), बांगलादेश (६२), आयर्लंड (३०), अफगाणिस्तान (२१) आणि झिम्बाब्वे (१२) यांचा क्रमांक येतो.