|| ऋषिकेश बामणे
सुतिर्था मुखर्जी, भारताची महिला
टेबल टेनिसपटू
मुंबई : टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरल्यामुळे कारकीर्दीतील एक स्वप्न साकार झाले आहे. परंतु आता ऐतिहासिक ऑलिम्पिक पदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्वस्व पणाला लावेन, अशी प्रतिक्रिया भारताची उदयोन्मुख टेबल टेनिसपटू सुतिर्था मुखर्जीने व्यक्त केली.
कोलकाताच्या २५ वर्षीय सुतिर्थाने मार्च महिन्यात झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेत महिला एकेरीत भारताची आघाडीची टेबल टेनिसपटू मनिका बत्रावर सरशी साधून कारकीर्दीत प्रथमच ऑलिम्पिक प्रवेश सुनिश्चित केला. काही वर्षांपूर्वी वयचोरीच्या आरोपाखाली सुतिर्थावर बंदी घालण्यात आली होती. परंतु २०१८च्या राष्ट्रकु ल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून तिने झोकात पुनरागमन केले. अल्टिमेट टेबल टेनिस लीगमध्ये यू मुंबाचे प्रतिनिधित्व करताना तिने स्वत:चे कौशल्य सिद्ध केले. डिसेंबरमध्ये पहिल्यांदाच जागतिक क्रमवारीत अव्वल १०० खेळाडूंत स्थान मिळवणाऱ्या सुतिर्थाशी आगामी ऑलिम्पिकची तयारी आणि कारकीर्दीतील आव्हानांबाबत केलेही ही खास बातचीत-
’ ऑलिम्पिक पात्रतेचे स्वप्न साकार झाल्यानंतर तुझ्या भावना काय होत्या?
गेल्या चार ते पाच वर्षांचा काळ माझ्या कारकीर्दीला कलाटणी देणारा ठरला आहे. त्यामुळे पात्रता स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात ज्यावेळी मी मनिकाला नमवले, त्यावेळी मला अश्रू अनावर झाले. कोणत्याही टेबल टेनिसपटूचे किंबहुना क्रीडापटूचे त्याच्या खेळातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न असते. माझे पात्रतेचे स्वप्न पूर्ण झाले असले तरी आता ऑलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून दिल्यावरच मी समाधान बाळगेन. त्या पदकाचा रंग सोनेरी असला तरी नक्कीच अधिक आनंद होईल. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने माझ्या मेहनतीला प्रारंभ झाला आहे.
’ टाळेबंदीमुळे मागील वर्ष सर्व क्रीडापटूंसाठी आव्हानात्मक ठरले. त्यादरम्यान तू स्वत:च्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीवर कसे लक्ष केंद्रित केले?
माझे कुटुंब मध्यमवर्गीय असल्याने टाळेबंदीच्या काळात मला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. परंतु मी जेथे सराव करते, तेथील प्रशिक्षकांनी मला फार साहाय्य केले. सौम्यदीप रॉय आणि पौलोमी घाटक यांनी ऑनलाइन प्रशिक्षण देण्यासह घरी स्वत:ची तंदुरुस्ती कशी राखता येईल, याविषयी मला महत्त्वाचे सल्ले दिले. त्याशिवाय फावल्या वेळेत (शॅडो प्रक्टिसिंगचा) मी सराव करायचे. प्रशिक्षक, मानसशास्त्रज्ञ यांच्याशी मी सातत्याने संवाद साधत राहायचे. त्यामुळे माझा सकारात्मक दृष्टिकोन त्या काळातही टिकून राहिला. आतादेखील मी घरीच सराव करण्यावर भर देत असून शारीरिक तंदुरुस्तीसुद्धा जपत आहे.
’ तुझ्या कारकीर्दीत अल्टिमेट टेबल टेनिस लीगचे किती महत्त्व आहे?
प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास अल्टिमेट टेबल टेनिस लीगमध्ये खेळल्यामुळेच मी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकले, असे मला वाटते. या स्पर्धेने मला देशी-विदेशी खेळाडूंसह खेळण्याची संधी दिली. या अनुभवामुळे माझ्या खेळात सुधारणा झाली. २०१९च्या हंगामात जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या चेंग आय चेंगवर मिळवलेला विजय माझ्या कारकीर्दीतील नेहमीच सर्वोत्तम विजयांपैकी एक असेल. त्यामुळे अल्टिमेट लीगला माझ्या कारकीर्दीत खास स्थान आहे. मुळात टेबल टेनिस खेळाचा देशाच्या कानाकोपऱ्यात प्रसार होण्यासही अल्टिमेट लीगने मोलाची भूमिका बजावली आहे, असे मला वाटते.
’ भारतातील टेबल टेनिसच्या सद्यस्थितीविषयी तुझे काय मत आहे?
सध्या आपल्याकडे एकामागून एक प्रतिभावान खेळाडू उदयास येत आहेत. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा तसेच शालेय पातळीवर टेबल टेनिसला महत्त्वाचे स्थान दिल्याचे हे फलित आहे. भारतीय संघातील अचंता शरथ कमल, जी. साथियान, मनिका, मधुरिका पाटकर यांसारखे अनुभवी खेळाडू युवा पिढीला या खेळाकडे वळण्यास प्रेरित करत आहेत. विशेषत: मुलींना या खेळाची निवड करताना पाहून मला अधिक आनंद होत आहे. आता आगामी ऑलिम्पिकमध्ये माझ्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असेल, याची कल्पना आहे. त्यामुळे ऑलिम्पिक पदकासाठी सर्वस्व झोकून देईन.