दिल्लीविरुद्धच्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्ये पोहोचणे खूप कठीण झाले आहे. दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील पहिला क्वालिफायर सामना जवळजवळ निश्चित आहे आणि एलिमिनेटर सामना खेळण्यासाठी बंगळुरूला तीन पैकी फक्त एक सामना जिंकणे आवश्यक आहे. त्याचबरोबर चौथ्या स्थानासाठी कोलकाता, मुंबई, राजस्थान आणि पंजाब दरम्यान शर्यत सुरू आहे. सध्या कोलकाता नेट रन रेटमध्ये आघाडीवर आहे आणि जर त्याने आपले दोन्ही सामने जिंकले, तर ते सहजपणे चौथ्या स्थानावर जातील. याशिवाय उर्वरित तीन संघ त्यांच्या कामगिरीवर तसेच नशिबावर अवलंबून असतील.

मुंबईने त्यांचे १२ पैकी पाच सामने जिंकले आहेत, तर ७ गमावले आहेत. १० गुणांसह रोहितचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. मुंबईचा नेट रन रेट देखील -०.४५३ आहे, जो इतर तीन संघांपेक्षा कमी आहे, जे चौथ्या स्थानासाठी मुंबईशी लढत आहेत. मुंबईचे उर्वरित दोन सामने राजस्थान आणि हैदराबादविरुद्ध आहेत आणि चौथ्या स्थानावर पोहोचण्यासाठी मुंबईला हे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. असे झाल्यास राजस्थान प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल, पण कोलकाताला हरवण्यासाठी मुंबईला त्यांचा रन रेट सुधारवावा लागेल किंवा त्यांच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. कोलकाताचा रन रेट +०.३०२ आहे.

हेही वाचा – IPL 2021 : “बरं झालं दिल्ली जिंकली…”, सुनील गावसकरांनी ‘त्या’ घटेनवरून पंचांना फटकारलं!

‘त्या’ पराक्रमाची करावी लागणार पुनरावृत्ती

२०१४ मध्येही मुंबईची अशीच परिस्थिती होती, जेव्हा सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याला सलग पराभवाला सामोरे जावे लागले. या हंगामातील शेवटचा साखळी सामना राजस्थान आणि मुंबई यांच्यात होता. या सामन्यात मुंबईला १४.३षटकांत विजय मिळवायचा होता, तरच ती प्लेऑफमध्ये पोहोचली असती. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने १८९ धावा केल्या होत्या आणि मुंबईने १४.३ षटकांत बरोबरी साधली होती. यानंतर आदित्य तरेने पुढच्या चेंडूवर षटकार मारून मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचवले होते.