राजस्थानच्या डेविड मिलरला बाद केल्यानंतर अश्विनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या आर. अश्विननं टी २० स्पर्धेत २५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. टी २० क्रिकेटमध्ये २५० विकेट्स घेणारा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा कारनामा पीयूष चावला आणि अमित मिश्रा यांनी केला आहे. सध्या या दोघांच्या नावावर २६२-२६२ विकेट्स आहेत. टी २० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम वेस्टइंडिजच्या ड्वेन ब्रावोच्या नावावर आहे. त्याने ५०१ सामन्यात ५४३ गडी बाद केले आहेत. त्यानंतर इम्रान ताहिरने ४२० विकेट्स घेतल्या आहेत. तर तिसऱ्या क्रमाकांवर सुनील नरेन आहे. नरेननं आतापर्यंत ४१३ गडी बाद केले आहेत. तर लसिथ मलिंगाने ३९० गडी बाद केले आहेत. तर सहा वर्षांपासून आपलं क्रिकेटची कारकिर्द सुरु करणारा राशीद खान या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. राशीदने टी-२० आतापर्यंत ३८५ गडी बाद केले आहेत. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराणा पेश करत राजस्थान रॉयल्सला ३३ धावांनी मात दिली आहे. आयपीएलच २०२१च्या ३६व्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय राजस्थानच्या गोलंदाजांनी सार्थकी लावला. दिल्लीच्या श्रेयस अय्यरने केलेल्या ४३ धावांच्या जोरावर त्यांना राजस्थानसमोर १५५ धावांचे आव्हान ठेवता आले. प्रत्युत्तरात राजस्थानचे स्टार फलंदाज दबावात फलंदाजी करण्यात अपयशी ठरले. कप्तान संजू सॅमसनने ७० धावा करत झुंज दिली खरी, पण त्याला दुसऱ्या बाजूने कोणीही साथ दिली नाही. दिल्लीने या विजयासह गुणतालिकेत १६ गुण नोंदवल पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.