आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली अद्याप चांगली कामगिरी करू शकलेला नाही. या हंगामात तो लगातार दोन वेळा गोल्डन डकवर बाद झालेला आहे. त्यामुळे त्याच्या खेळावर चिंता व्यक्त केली जात आहे. एका माजी क्रिकेटरने तर विराट कोहलीचा खेळ बघून डोळ्यात अश्रू येत आहेत, असं म्हटलंय.

हेही वाचा >>> IPL 2022 : “त्याने फलंदाजीसाठी सलामीला येणं बंद करावं” आरसीबीच्या माजी कर्णधाराचा रोहित शर्माला सल्ला

माजी क्रिकेटर आकाश चोपडा यांनी विराट कोहलीच्या खेळावर चिंता व्यक्त केली आहे. “विराट कोहली कधी धावा करणार हा प्रश्न आहे. आतापर्यंत सलग दोन वेळा तो गोल्डन डकवर बाद झालेला आहे. तर दोन वेळा तो धावबाद झालाय. माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी हे खेळाडू म्हणजे लोकांच्या भावना झाले आहेत. आता मात्र विराट आणि रोहित या दोघांच्या बाबतीत सहानुभूती निर्माण होत आहे. हे खेळाडू चांगली खेळी करतील असं आपल्याला पुन्हा-पुन्हा वाटतंय. पण तसं होत नाहीये. विराट कोहलीसाठी तर मला वाईट वाटत आहे,” असं आकाश चोपडा यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटलंय.

हेही वाचा >>> संन्यास घेऊनही सचिन तेंडुलकरचे ‘हे’ विक्रम अद्याप अबाधित, विराट कोहलीही आहे खूप दूर

आयपीएल क्रिकेटमध्ये धडाकेबाज खेळी करणारा खेळाडू विराट कोहली या हंगामामध्ये मात्र चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये. विराटच्या बंगळुरु संघाने आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत. या आठ सामन्यांत विराटने आतापर्यंत ११९ धावा केल्या आहेत. यामध्ये पाच सामन्यांत तो दहा चेंडूंच्या आत बाद झाला आहे. तो दोन वेळा डक आऊटवर बाद झालाय. तर दोन वेळा धावबाद झालाय. त्यामुळे विराट पुढील सामन्याततरी चांगली खेळी करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.