Sanju Samson’s Reaction After Defeat Against RCB: आयपीएल २०२३ च्या ६० व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात खेळला गेला. सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने राजस्थानचा ११२ धावांनी मोठा पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ ५९ धावांवर गारद झाला. या सामन्यानंतर आरआर कर्णधार संजू सॅमसनने पराभवावर प्रतिक्रिया दिली.
पराभवानंतर संजू सॅमसन काय म्हणाला?
पराभवानंतर संजू सॅमसन म्हणाला की, “मला वाटते की आमचे आघाडीचे तीन खेळाडू खूप धावा करत होते, आम्ही पॉवरप्लेमध्ये खूप मेहनत करतो पण आज तसे होऊ शकले नाही. तुम्हाला पॉवरप्लेमध्ये जोरदार फटके खेळण्याची गरज असते. कारण चेंडू हळू आणि जुना होत होता, मी, जैस्वाल आणि जोस असेच खेळलो. आरसीबीच्या गोलंदाजांनी ज्याप्रकारे गोलंदाजी केली ते प्रशंसनीय आहे..आम्ही आमच्यासमोर असलेल्या लक्ष्याच्या आसपास जायला हवे होते, पण आम्ही तसे करू शकलो नाही. मला वाटले की हा खूप जवळचा सामना ठरु शकला असता.”
संजू सॅमसन पुढे म्हणाला की, “पॉवरप्लेमध्ये आम्ही चांगली फलंदाजी केली असती, तर सामना नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत गेला असता, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. आमचे फलंदाज ज्या प्रकारे सहज बाद झाले, मला वाटते त्यावर काम करण्याची गरज आहे. यावेळी माझ्याकडे उत्तर नाही. आपल्या सर्वांना आयपीएलच्या स्वरूपाची जाणीव आहे, आपण अनेक अविश्वसनीय गोष्टी घडताना पाहिल्या आहेत. सध्या आमचे लक्ष धर्मशाला येथे होणाऱ्या सामन्यावर आहे. माझ्या मते, संघातील सर्व खेळाडूंनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे.”
हेही वाचा – RR vs RCB: किरॉन पोलार्डला मागे टाकत विराट कोहलीने रचला विक्रम; ‘हा’ कारनामा करणारा ठरला दुसराच खेळाडू
राजस्थानचा सर्वात मोठा पराभव –
आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांत ५ गडी गमावून १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ १०.३ षटकांत ५९ धावांत गारद झाला. आयपीएलच्या इतिहासातील राजस्थान रॉयल्सचा हा सर्वात मोठा पराभव आहे.