IPL 2024, Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders: आयपीएलमधील केकेआर विरूद्ध आरसीबीचा सामना रंगणार म्हणजे विराट कोहली आणि गौतम गंभीर पुन्हा एकदा आमनेसामने येणार हे निश्चित. गेल्यावर्षीचा आयपीएलमधील वादाचा प्रसंग सर्वांनाच चांगला लक्षात होता. केकेआरविरूद्धच्या सामन्यात विराट कोहली मैदानावर प्रथम फलंदाजी करत होता तर केकेआरचा संघ गोलंदाजी करत होता. या सामन्यात स्ट्रॅटेजिक टाईम आऊटदरम्यान गंभीर कोहलीजवळ येताना दिसला, पण दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याने सारेच आश्चर्यचकित झाले. यावर सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

चिन्नास्वामीवरील सामन्यात टाइमआउटच्या वेळी गंभीर केकेआरच्या खेळाडूंशी संवाद साधत असतानाच तो कोहलीकडे गेला, जो पाणी पीत खेळाडूंसोबत चर्चाही करत होता. विराट गंभीर भेटताच त्यांनी आधी मिठी मारली आणि यानंतर दोघे हसत खेळत एकमेकांशी गप्पा मारताना दिसले. हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत होता. ब्रॉडकास्टर्सनीही हा व्हीडिओ संपूर्ण सामन्यात अनेक वेळा दाखवला आणि त्यातील एका रिप्लेदरम्यान, शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली – “विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील गळाभेटीसाठी केकेआरला फेअरप्ले पुरस्कार.”

रवी शास्त्रींसोबत समालोचन करत असलेले गावसकर म्हणाले – “फक्त फेअरप्ले पुरस्कार नाही तर ऑस्करदेखील दिला पाहिजे.” गेल्या वर्षी लखनऊमध्ये झालेल्या भांडणानंतर कोहली आणि गंभीरने एकत्र दिसले. एलएसजीच्या नवीन-उल-हकसोबत कोहलीचा मैदानावर वाद झाला, त्यामुळे पंचांना हस्तक्षेप करावा लागला. सामना संपल्यानंतर दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केले. काही क्षणांनंतर कोहली आणि गंभीर एकमेकांवर आरोप करताना दिसले. ज्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता.

२०१३ मधील आयपीएल सामन्यादरम्यान पहिल्यांदाच त्यांच्यात वाद झाला होता. २०१६ मध्ये या दोघांमध्ये आणखी एक वाद पाहायला मिळाला. ७ वर्षांनंतर लखनऊमध्ये गेल्या मोसमात सामन्यानंतर एकमेकांसोबत भिडताना दिसले होते.