Mitchell Starc Wife Alyssa Healy Reveals PBKS vs DC Match Dharamsala: भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले. येत्या २७ मे पासून आयपीएलचे उर्वरित सामने पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. गेल्या आठवड्यात, धरमशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामनाही मध्येच रद्द करण्यात आला होता, त्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंना स्टेडियममधून बाहेर आणि हॉटेलमध्ये नेतानाचं वातावरण खूपच तणावपूर्ण असल्याचं मिचेल स्टार्कच्या पत्नीने सांगितलं.

मिचेल स्टार्कची पत्नी एलिसा हिली हिने धरमशाला येथील सामन्यादरम्यान ब्लॅकआउट आणि त्यावेळच्या वातावरणाबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. अचानक झालेल्या ब्लॅकआउटमुळे खेळाडू आणि एकूणच वातावरण किती तणावाचं होतं हे तिने सांगितले.

८ मे रोजी धरमशालामध्ये सामना सुरू असताना आजूबाजूच्या परिसरात ब्लॅकआऊट दिला गेला. ज्यामुळे ११ व्या षटकात स्टेडियमचे फ्लडलाईट्स अचानक बंद करण्यात आले आणि त्यानंतर सामना रद्द करण्यात आला आणि पटपट खेळाडू तसेच प्रेक्षकांना स्टेडियमबाहेर नेत सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली.

सोमवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रबंदी करारानंतर, येत्या शनिवारी आयपीएल पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्या रात्रीबद्दल बोलताना, हिली म्हणाली की तो एक ‘अवास्तव अनुभव’ होता, हिलीने विलो टॉक पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितले.

एलिसा हिली म्हणाली, “तो एक अविश्वसनीय अनुभव होता. अचानक काही लाईट टॉवर्स गेले आणि आम्ही तिथे वाट पाहत बसलो होतो… आमचं कुटुंब आणि अतिरिक्त सपोर्ट स्टाफचा एक मोठा गट तिथे बसला होता आणि पुढच्याच क्षणी आम्हाला बसमध्ये बसवणारा माणूस आला आणि त्याचा चेहरा फिका पडला होता.”

पुढे सांगताना हिली म्हणाली, “त्याने क्षणात म्हटलं, आपल्याला आताच बसमध्ये जावं लागेल. त्यानंतर अजून एक माणूस आला, त्याचा चेहराही फिका पडला होता आणि त्याने एका लहान मुलाचा हात धरला अन् म्हटलं, आपल्याला आताच्या आता इथून बाहेर पडावं लागेल. आमचं असं झालं की, नेमकं झालंय तरी काय? आम्हाला काही सांगितलं नाही. आम्हाला काहीच कल्पना नव्हती. नंतर आम्हाला एका रूममध्ये नेण्यात आलं. सगळेजण तिथेच होते. फाफने (फाफ डू प्लेसिस) तर पायात शूज पण घातले नव्हते. आम्ही बसची वाट पाहत आणि टेन्शनमध्ये होतो.”

“मी मिचला (मिचेल स्टार्क) विचारलं की नेमकं काय चाललंय? तो म्हणाला इथून ६० किलोमीटर लांब शहरात मिसाईल्सने हल्ला झाला होता आणि त्यामुळे संपूर्ण भागात ब्लॅकआऊट दिला आहे. यामुळे लाईट्स बंद झाले होते, कारण त्यावेळी धरमशाला स्टेडियम एका दीपस्तंभासारखे होते. अचानक आम्हाला व्हॅनमध्ये बसवलं आणि हॉटेलमध्ये परत नेण्यात आलं. सगळा वेडेपणा सुरू होता”, असा हिलीने पुढील प्रसंग सांगितला.

हिलीने या प्रकरणाबाबत पुढे असंही सांगितलं की तिने आणि स्टार्कने काही रडार ऑपरेटेड सिस्टिमही पाहिल्या, ज्या मिसाईलचे मारे रोकतील. तर काही जण रस्त्यावरून येताजातानाही दिसले.