Virat Kohli Angry on Digvesh Rathi mankad Attempt : लखनौमधील एकाना स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीगमधील शेवटचा साखळी सामना मंगळवारी (२७ मे) खेळवण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व लखनौ सुपरजायंट्स या दोन संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या या चित्तथरारक सामन्यात बंगळुरूने लखनौवर मात केली. लखनौने कर्णधार ऋषभ पंतच्या ११८ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर बंगळुरूसमोर २२७ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, आरसीबीने कर्णधार जितेश शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर ६ विकेट्स व ८ चेंडू राखून एलएसजीचा पराभव केला.
दरम्यान, या चित्तथरारक सामन्यात अनेक गंमतीजमती घडल्या. तसेच अनेक हाय व्होल्टेज क्षणही पाहायला मिळाले. या हाय व्होल्टेज घटनांची बरीच चर्चा होत आहे. यापैकी दोन घटना लखनौचा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीच्या बाबतीत घडल्या आहेत. दिग्वेश या सामन्यात दोन वेळा तोंडघशी पडल्याचं पाहायला मिळालं. तसेच दिग्वेशने अनेकदा आक्रमक खेळ करत बंगळुरूला सामन्यात मागे ढकलण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा एक प्रयत्न पाहून बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहली प्रचंड संतापल्याचं देखील पाहायला मिळालं.
दिग्वेशकडून जितेश शर्माला मंकडिंग धावबाद करण्याचा प्रयत्न
दिग्वेश राठी गोलंदाजी करत असताना त्याने बंगळुरूचा स्टँड इन कर्णधार जितेश शर्माचं मांकडिंग रनआऊट अपील केलं होतं. जितेशने देखील क्रिज सोडलं होतं. त्यामुळे नियमाप्रमाणे तो बाद झाला असता, मात्र, लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने खिलाडूवृत्ती दाखवत दिग्वेशचं अपील मागे घेतलं. परिणामी पंचांनी त्याला नाबाद घोषित केलं आणि जितेश शर्माला एक संधी मिळाली. मात्र, दिग्वेशने मंकडिंग अपील केलं तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये उभा असलेला विराट कोहली खूप संतापला होता. त्याने त्याचा संताप त्याच्या कृतीतून व्यक्त केला.
बंगळुरूची लखनौवर मात
दरम्यान, या सामन्यात लखनौने दिलेल्या २२७ धावांचा पाठलाग करताना बँगलोरच्या फलंदाजांनी चांगली सुरूवात केली होती. विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी ५ षटकांत ६० धावांची सलामी दिली. सॉल्ट ३० धावा करत बाद झाला. तर, विराट कोहलीने पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी केली. विराट ३० चेंडूत १० चौकारांसह ५४ धावा केल्या. त्यानंतर मयंक अग्रवाल (२३ चेंडूत ४१) आणि जितेश शर्मा (३३ चेंडूत ८५) यांनी आक्रमक खेळ करत संघाला विजयापर्यंत नेले.