Who is Raj Angad Bawa: आयपीएल २०२५ च्या हंगामातील प्लेऑफमधील दुसरा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या संघादरम्यान आज होत आहे. मुंबई संघातील महत्त्वाचे खेळाडू संघाबाहेर गेल्यामुळे आज तीन खेळडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. यात २२ वर्षीय अष्टपैलू खेळाडू राज अंगद बावाचा समावेश करण्यात आला आहे. तर जॉनी बेयरस्टो आणि रिचर्ड ग्लीसन या दोन खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पांड्याने सांगितले की, कालच्या पेक्षा आज विकेट वेगळी वाटत आहे. या विकेटवर गवत कमी दिसत असून पहिल्या डावात चांगल्या धावा केल्यास दुसऱ्या डावात प्रतिस्पर्ध्यांना रोखता येऊ शकेल. मागच्या ९ सामन्यांपासून आम्ही नॉकआऊटसारखेच खेळत आहोत. आज आम्ही संघात तीन बदल केले आहेत.

जॉनी बेयरस्टो आणि रिचर्ड ग्लीसन हे परिचित असलेले आंतरराष्ट्रीय खेळाडू आजच्या सामन्यात आहेत. मात्र अंतिम ११ मध्ये २२ वर्षीय राज बावाचे नाव वाचून अनेकांना आश्चर्य वाटले.

कोण आहे राज बावा?

अष्टपैलू खेळाडू राज बावा डावखुरा फलंदाज असून उजव्या हाताने मध्यम वेगवान गोलंदाजी करतो. २०२२ साली त्याने पंजाब किंग्जकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. नोव्हेंबर २००२ साली हिमाचल प्रदेशच्या नाहन येथे जन्मलेला राज बावा हा भारताचे माजी हॉकीपटू त्रिलोचन सिंग बावा यांचा नातू आहे. १९४८ साली लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकले होते. त्रिलोचन सिंग बावा तेव्हा या संघाचा भाग होते. राजचे वडील सुखविंदर बावा हे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक आहेत. त्यांनी भारताचा धडाकेबाज माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला मार्गदर्शन दिले होते.

राज बावा युवराज सिंगला आपला आदर्श मानतो. त्यामुळेच तो डावखुरा फलंदाज बनला, असे सांगितले जाते. युवराजचा वाढदिवस (१२ डिसेंबर) आणि आजोबांचा वाढदिवस (१२ फेब्रुवारी) १२ तारखेला येत असल्यामुळे तो १२ क्रमांकाची जर्सी वापरतो.

चंदीगडच्या १९ वर्षांखालील संघात राज बावा क्रिकेट खेळलेला आहे. तसेच २०२१ साली त्याने १९ वर्षांखालील आशिया कप आणि २०२२ साली १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२२ साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताच्या जेतेपदात राज बावाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने ६३ च्या सरासरीने २५२ धावा ठोकल्या होत्या. तसेच गोलंदाजी करताना नऊ बळी मिळवले होते. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने गोलंदाजीत ३१ धावा देऊन पाच बळी मिळवले होते.