Mumbai Indians Hardik Pandya: आयपीएल २०२४ मध्ये सध्या प्लेऑफसाठी चढाओढ सुरु आहे. पण याच दरम्यान हार्दिकच्या नेतृत्वाखालील चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या वरिष्ठ सदस्यांनी कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माला मुंबईच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा एमआयचा निर्णय संघासाठी फारसा फलदायी ठरला नाही. ज्या कर्णधाराने मुंबईला ५ आयपीएलची जेतेपदं मिळवून दिली त्याला बाजूला करत हार्दिक पंड्याला कर्णधार केले खरे पण प्रत्येक सामन्यादरम्यान हार्दिकची हुर्यो उडवली.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्स संघाच्या वरिष्ठ खेळाडूंनी कोचिंग स्टाफला कळवले की, ड्रेसिंग रूममध्ये उत्साहाचं वातावरण नाही आणि याचे कारण म्हणजे हार्दिक पांड्याची नेतृत्व शैली.

हेही वाचा- IPL 2024: हार्दिक पंड्या भर मैदानात बुमराहवर ओरडला, निराश झालेल्या जसप्रीतने दिली अशी प्रतिक्रिया; Video व्हायरल

एमआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “मुंबई इंडियन्सची सध्यस्थिती ही नव्या नेतृत्त्वामुळे झालेली नाही, तर गेल्या १० वर्षांपासून रोहितच्या कर्णधारपदाची सवय असलेला संघ अजूनही कर्णधार आणि संघाच्या नेतृत्व शैलीच्या बदलाशी जुळवून घेत आहे. नेतृत्व बदल होणाऱ्या संघासाठी ही कायमचं एक समस्या राहिली आहे. खेळामध्ये असे प्रकार सातत्याने घडत असतात.”

एका सामन्यानंतर प्रशिक्षक वर्ग आणि काही खेळाडू यांची एक मीटिंग झाली. यामध्ये मुंबई संघाचा पूर्वीपासून भाग असलेले रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह अशा वरिष्ठ खेळाडूंचा समावेश होता. या मीटिंगदरम्यान खेळाडूंनी आपले विचार मांडले आणि संघाची कामगिरी का खालावली आहे, या कारणांवर चर्चा केली. यानंतर हे वरिष्ठ खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाच्या प्रतिनिधीसोबत व्यक्तिगत संवादही झाला.

तिलक वर्माच्या खेळावर प्रश्नचिन्ह

दिल्ली कॅपिटल्सकडून झालेल्या पराभवानंतर हार्दिकच्या सामन्यानंतरच्या वक्तव्यामध्ये “match awareness” नसल्याबद्दल संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू तिलक वर्मावर टिपण्णी केली.

हेही वाचा-IPL 2024: संजू सॅमसनला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त; राजस्थान पराभूत, प्लेऑफ प्रवेश लांबणीवर

“जेव्हा अक्षर पटेल डाव्या हाताच्या फलंदाजाला (तिलक) गोलंदाजी करत होता, तेव्हा त्याच्या चेंडूविरूद्ध फटेकबाजी करणे हा अधिक चांगला पर्याय होता,” हार्दिकने सामन्यानंतर बोलताना सांगितले. “मला वाटते की आम्ही match awareness च्या बाबतीत थोडे मागे पडलो आणि हे देखील आमच्या पराभवाचे एक प्रमुख कारण होते.” संघाच्या अपयशासाठी एका खेळाडूला दोष दिल्याचे ड्रेसिंग रूममध्ये वाईट पडसाद उमटले, असे सूत्रांनी सांगितले.

या हंगामात मुंबईच्या ताफ्यात सारं काही आलबेल नाहीय, काहीतरी नक्कीच घडतं असल्याचे वक्तव्य अनेक क्रिकेट तज्ञांनी केले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने असे म्हटले आहे की संघ दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. ‘मला वाटते की त्या ड्रेसिंग रूममध्ये वेगवेगळे गट आहेत. त्यामुळे काही गोष्टी साध्य होत नाहीत. ते संघटित होत नसल्याने एक संघ म्हणून खेळू शकत नाहीत.’ असे क्लार्क म्हणाला.

मुंबई इंडियन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, फ्रँचायझी दरवर्षीप्रमाणेच या हंगामाचाही आढावा घेईल आणि गरज पडल्यास संघाच्या भविष्याचा विचार करत काही निर्णयही घेतले जातील.