Rajat Patidar On RCB Defeat Against PBKS, IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेतील ३४ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने सामन्याला उशिराने सुरुवात झाली. सामन्याची वेळ निघून गेल्याने हा सामना २० षटकांऐवजी १४-१४ षटकांचा खेळवण्यात आला. घरच्या मैदानावर खेळताना पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. या सामन्यात पंजाबने ५ गडी राखून बाजी मारली.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या नावे नकोसा विक्रम

पंजाबविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला ५ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. यासह या संघाच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. आयपीएल स्पर्धेत घरच्या मैदानावर खेळताना सर्वाधिक सामने गमावणाऱ्या संघांच्या यादीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. या संघाने आतापर्यंत घरच्या मैदानावर खेळताना ४६ सामने गमावले आहेत. यासह या संघाने या लाजिरवाण्या विक्रमात दिल्ली कॅपिटल्सला मागे सोडलं आहे. यापूर्वी घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने गमावण्याचा विक्रम हा दिल्लीच्या नावावर होता. दिल्लीने ४५ सामने गमावले आहेत.

आयपीएल स्पर्धेत एकाच मैदानावर खेळताना सर्वाधिक सामने गमावणारे संघ:

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (बेंगळुरू) – ४६ सामने
दिल्ली कॅपिटल्स (दिल्ली)- ४५ सामने
कोलकाता नाईट रायडर्स (कोलकाता) – ३८ सामने
मुंबई इंडियन्स (मुंबई) – ३४ सामने
पंजाब किंग्ज (मोहाली) – ३० सामने

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या पराभवाला कारणीभूत कोण? रजत पाटीदार काय म्हणाला?

पंजाब किंग्जविरुद्धच्या पराभवानंतर बोलताना रजत पाटीदार म्हणाला, ” फंलदाजी युनिट म्हणून आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. भागीदारी करणं महत्त्वाचं होतं, पण आमच्या फलंदाजांनी एकापाठोपाठ विकेट्स टाकल्या.”

संघातील गोलंदाजांचं कौतुक करताना तो म्हणाला की, ” खेळपट्टी कशीही असो, आम्हाला चांगली फलंदाजी करावीच लागेल आणि मोठी धावसंख्या उभारावी लागेल. आमच्या संघातील गोलंदाज खूप चांगली कामगिरी करत आहेत, ही आमच्यासाठी सकारात्मक बाब आहे. मात्र, या सामन्यात फलंदाजांनी जिद्दीने फलंदाजी केली, ही देखील चांगली बाब आहे.”

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला १४ षटकांअखेर ९ गडी बाद ९५ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने १२.१ षटकांत दिलेलं आव्हान पूर्ण केलं आणि ५ गडी राखून शानदार विजयाची नोंद केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.