LSG vs RCB, IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत आपल्या शेवटच्या सामन्यात तुफान चर्चेत राहिला. संपूर्ण हंगामात ऋषभ पंतची बॅट शांत राहिली. पण, साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात त्याने नाबाद ११८ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या २२७ धावांवर पोहोचवली. मात्र, तरीदेखील लखनऊचा संघ सामना जिंकू शकलेला नाही. हा सामना गमावल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
या सामन्यात लखनऊचे गोलंदाज निर्धारीत वेळेत २० षटकं टाकू शकलेले नाहीत. स्लो ओव्हर रेटमुळे बीसीसीआयने लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतला ३० लाखांचा दंड ठोठावला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने या हंगामात तिसऱ्यांदा ही चूक केली आहे. त्यामुळे ऋषभ पंतला ३० लाखांचा दंड ठोठावला आहे. तर संपूर्ण संघावर १२ लाख किंवा मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याआधी ५ एप्रिल आणि २६ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यातही लखनऊ सुपर जायंट्स संघाला निर्धारीत वेळेत २० षटकं टाकता आली नव्हती. त्यामुळे ऋषभ पंतवर दंड ठोठावण्यात आला होता.
ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी?
आयपीएल २०२४ स्पर्धेतील शेवटच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला होता. हार्दिकने तिसऱ्यांदा ही चूक केल्यामुळे त्याच्यावर ३० लाखांचा दंड आणि एका सामन्याची बंदी घातली गेली होती. त्यामुळे तो आयपीएल २०२५ स्पर्धेतील पहिला सामना खेळू शकला नव्हता. मात्र, या नियमांत आता बदल करण्यात आला आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेत या नियमांत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी घातली जाणार नाही.
लखनऊचा पराभव
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटकांअखेर २२७ धावा केल्या. लखनऊकडून कर्णधार ऋषभ पंतने सर्वाधिक ११८ धावांची खेळी केली. तर सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या मिचेल मार्शने ६७ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून कर्णधार जितेश शर्माने नाबाद ८५ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने क्वालिफायर १ मध्ये प्रवेश केला आहे.