IPL 2025 Rishabh Pant Jitesh Sharma Viral Video: आरसीबीने अखेरच्या लीग टप्प्यातील सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा ६ विकेट्सने पराभव करत २२७ धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले. जितेश शर्माच्या ८५ धावांच्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तर आरसीबीच्या संपूर्ण फलंदाजी विभागाच्या योगदानाने संघाने हा विजय सहज नोंदवला. पण ऋषभ पंतची शतकी खेळी तितकंच लक्षवेधी ठरली. शिवाय त्याने आरसीबीच्या डावादरम्यान केलेल्या कृतीने सर्वांचं मन जिंकलं.
लखनौचा संघाने आपल्या यंदाच्या मोहिमेची सांगता पराभवाने केली असली तरी ऋषभ पंतने अखेरच्या सामन्यात आपला फॉर्म दाखवला. ऋषभ पंत या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आणि त्याने ६१ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ११८ धावांची वादळी खेळी केली. तर पंतने शतकानंतर मैदानावर कार्टव्हिल करत याचं सेलिब्रेशन केलं, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
लखनौच्या मैदानावर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात ऋषभ पंतने आपल्या खेळभावनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लखनौ सुपर जायंट्सचा स्टँड इन कर्णधार याचं मांकडिंग रनआऊट अपील पंतने मागे घेतलं. ज्यामुळे सामन्याला टर्निंग पॉईंट येता येता राहिलं. ऋषभ पंतच्या या कृतीमुळे एक वादाचा क्षण परस्पर आदराच्या क्षणात बदलला.
आरसीबीच्या डावातील १७ व्या षटकात, लखनौचा फिरकीपटू दिग्वेश सिंग राठी गोलंदाजीला आला. त्या षटकात पाचव्या चेंडूवर मयंक अग्रवाल स्ट्राईकवर होता, तर जितेश शर्मा नॉन स्ट्राईकर एंडवर होता. पाचवा चेंडू टाकण्यासाठी दिग्वेश रनअप घेत आला आणि तितक्यात जितेश शर्मा क्रीझबाहेर गेला आणि दिग्वेशने बेल्स उडवल्या.
मैदानावरील पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवला. रिप्लेमध्ये आधी जितेश शर्मा क्रीझ सोडून बाहेर गेला आहे की नाही, याची खात्री केली. तर जितेश बेल्स उडवण्यापूर्वी क्रीझबाहेर गेला होता. पंचांच्या “आउट” सिग्नलसाठी स्टेडियम थांबले होते, तेव्हाच मोठा स्क्रीनवर “नॉट आउट” लिहून आलं. ऋषभ पंतने धावबादचं अपील मागे घेतले होते.
समोरचा खेळाडू बाद असल्याचा दावा करण्याचा अधिकार त्याच्याकडे असतानाही, त्याने फायद्यापेक्षा खेळाच्या भावनेचा मार्ग निवडला. या निर्णयाने प्रेक्षकांना गोंधळात टाकले. हे पाहताच जितेश पुढे गेला आणि त्याने पंतला थांबवून मिठी मारली.
जितेश आणि मयंक अग्रवाल यांनी एक महत्त्वाची भागीदारी रचली होती, ज्यामुळे सामना आरसीबीच्या बाजूने झुकला होता. पंतने रन-आउटचा अपील मागे घेण्याच्या निर्णयामुळे ‘नॉन-स्ट्रायकरला रन-आउट’ या वादविवादाला पुन्हा उधाण आलंय. बाद करण्याची ही पद्धत कायदेशीर आहे परंतु अनेकदा खेळाच्या भावनेविरुद्ध जाण्यासाठी टीकाही होते.
तिसऱ्या पंचांनी रिप्ले तपासला, ज्यामध्ये रन-आउटचा प्रयत्न करण्यापूर्वी राठीने त्याची गोलंदाजी अॅक्शन पूर्ण केली आहे की नाही हे पाहिलं. खेळाच्या नियमांनुसार गोलंदाजाने त्याची चेंडू टाकण्याची क्रिया पूर्ण करण्यापूर्वी रनआऊट करणं गरजेचं असत. पण दिग्वेशने मात्र त्याची चेंडू टाकण्याची क्रिया पूर्ण करून पॉपिंग क्रीज ओलांडली होती आणि त्यामुळे जितेश शर्मा नियमानुसार नाबाद राहिला. पण पंतनेही अपील नाकारत सर्वांचं मनं जिंकलं.
मैदानावर हा रनआऊटचा प्रसंग सुरू असताना ड्रेसिंग रूममधून संपूर्ण प्रकरण पाहून विराट कोहली चांगलाच वैतागला होता. रनआऊटचा निर्णय जर आरसीबीच्या विरूद्ध लागला असता तर सामन्यावर याचा नक्कीच परिणाम झाला असता. पण अखेरीस जितेश नाबाद राहिला आणि विजयी फटकेबाजी करत त्याने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.