RCB Records In IPL: आयपीएल २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमनेसामने होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासमोर विजयासाठी २२८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजांनी ८ चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केले. हा सामना जिंकताच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल २०२५ स्पर्धेतील क्वालिफायर १ मध्ये प्रवेश केला आहे. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

आयपीएलमध्ये प्रत्येक संघाला ७ सामने हे घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळते. तर ७ सामने हे घराबाहेर जाऊन खेळायचे असतात. घरच्या मैदानांवर खेळण्याचा संघांना जास्त फायदा होतो. कारण चाहत्यांचा सपोर्ट तगडा असतो आणि खेळाडूंना खेळपट्टीचा अंदाजही आलेला असतो. मात्र, यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आगळा वेगळा कारनामा करून दाखवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने घराबाहेर खेळताना सर्व ७ सामने जिंकले आहेत. असा कारनामा करणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा एकमेव संघ ठरला आहे. याआधी कुठल्याही संघाला घराबाहेर खेळताना सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवता आलेला नाही. याआधी कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०१२ मध्ये ८ पैकी ७ सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. तर मुंबई इंडियन्स संघाने २०१२ मध्ये ८ पैकी ७ सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. तर गुजरातने ७ पैकी ६ आणि राजस्थान रॉयल्सने देखील ७ पैकी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला होता.

घराबाहेर खेळताना सर्वाधिक सामने जिंकणारे संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ७ सामन्यांमध्ये ७ विजय (२०२५)
कोलकाता नाईट रायडर्स – ८ सामन्यांमध्ये ७ विजय (२०१२)
मुंबई इंडियन्स – ८ सामन्यांमध्ये ७ विजय (२०१२)
गुजरात टायटन्स – ७ सामन्यांमध्ये ६ विजय (२०२३)
राजस्थान रॉयल्स – ७ सामन्यांमध्ये ६ विजय (२०२२)

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून लखनऊ सुपर जायंट्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून मिचेल मार्शने ६७ आणि ऋषभ पंतने सर्वाधिक ११८ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २२७ धावांपर्यंत पोहोचवली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून जितेश शर्माने नाबाद ८५ धावांची खेळी करून संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.