Virat Kohli IPL Selection Story: आयपीएलच्या १८ व्या हंगामात एक नवा इतिहास घडणार आहे. आजवर कधीही आयपीएलची ट्रॉफी न जिंकणारे दोन संघ अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी अंतिम सामन्यात दिमाखात धडक दिली. यापैकी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी यंदाचा हंगाम विशेष आहे. आयपीएल आता १८ वर्षांचे झाले आहे. या १८ वर्षांत अनेक खेळाडू या संघातून त्या संघात गेले. अगदी रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीनेही दोन वर्षांसाठी संघ बदलला होता. मात्र विराट कोहली सुरूवातीपासून आरसीबीच्या संघात राहिला. यंदा आरसीबी जिंकल्यास त्याला अधिक आनंद होईल.
१८ वर्षांपूर्वी २००८ साली जेव्हा आयपीएलची सुरुवात झाली. तेव्हा विराट कोहली १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघात खेळत होता. मुळचा दिल्लीकर असलेला विराट कोहलीला दिल्लीच्या संघात घेतले जाईल, अशी शक्यता होती. मात्र विराट कोहलीचा आरसीबी संघात येण्याचा प्रवास सुरस कथेसारखा आहे. दिल्लीच्या संघाने खेळाडू निवडताना १८ वर्षांपूर्वी केलेली चूक त्यांना आजही नक्कीच बोचत असेल.
१८ वर्षांपूर्वी काय झाले?
२००८ साली आयपीएल सुरू होण्याच्या दोन महिने आधी म्हणजे फेब्रुवारीत तेव्हाच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने आपला संघ बांधायला घेतला होता. तेव्हाचे संघाचे क्रिकेट ऑपरेशन्सचे प्रमुख टीए शेखर म्हणाले की, २२ वर्षांखालील चार खेळाडूंची आम्हाला निवड करायची होती. तसेच संघा ज्या शहराचा आहे, त्याठिकाणच्या काही खेळाडूंनाही सामावून घ्यायचे होते. आमच्यासमोर विराट कोहली, प्रदीप संगवान आणि तन्मय श्रीवास्तव या तिघांचा पर्याय होता.
मुळचा दिल्लीचा असलेला विराट कोहली तेव्हा भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार होता. तसेच रणजी ट्रॉफीमध्ये तो दिल्लीच्या संघाचे नेतृत्वही करत होता. त्यामुळे कोहलीला दिल्लीचा संघ घेईल, असे गृहित धरले जात होते. आरसीबीचे तत्कालीन सीईओ चारू शर्मा हे आरसीबीसाठी खेळाडूंची निवड करत होते. त्यांनी १९ वर्षांखालील संघात खेळणाऱ्या मनीष पांडेला निवडण्याचा विचार केला होता. मात्र मनीष पांडेंनी निवड प्रक्रियेदरम्यानच एजंटची भेट घेतल्यामुळे त्याला बाजूला करण्यात आले.
चारू शर्मा यांनी ही बाब आरसीबी संघाचे मालक विजय मल्ल्या आणि इतर सीईओंच्या कानावर घातली. त्यानंतर १९ वर्षांखालील संघातून प्रत्येकी दोन खेळाडू लिलावातून निवडण्याची संधी संघांना दिली गेली.
आणि दिल्लीने कोहलीला नाकारले
लिलावात कोहलीला दिल्लीचा संघ घेईल, असा कयास असताना दिल्लीच्या संघाने धक्काच दिला. त्यांनी डावखुरा वेगवान गोलंदाज प्रदीप संगवानची निवड केली. दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघात त्यावेळी गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, एबी डी व्हिलियर्स, दिनेश कार्तिक, तिलकरत्ने दिलशान आणि मनोज तिवारी अशा दिग्गज फलंदाजांचा भरणा होता. तसेच त्यांनी दिल्लीचा शिखर धवन आणि मिथुन मनहासलाही संघात घेतले होते.
संगवान हादेखील दिल्लीचाच. डावखुरा गोलंदाज म्हणून तो भविष्यात चमकेल, असे अनेकांना वाटत होते. त्यावेळी भारताच्या मुख्य संघातही आशिष नेहरा, झहीर खान आणि इरफान पठाण अशा डावखुऱ्या गोलंदाजांची चलती होती. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा मुख्य खेळाडू विरेंद्र सेहवागने त्यावेळी संगवानला संघात घेण्याबद्दल सकारात्मकता दाखवली.
जेव्हा आरसीबीची खेळाडू निवडण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी विनाविलंब विराट कोहलीला संघात घेतले. चारू शर्मा म्हणाले होते की, कोहली भविष्यात जागतिक किर्तीचा खेळाडू होईल, असे कुणालाच वाटले नव्हते. पण १९ वर्षांखालील संघातही त्याने आपल्या खेळाची चमक दाखवली होती.
बंगळुरूच्या संघात येऊनही पहिली तीन वर्ष विराट कोहलीसाठी फार आशादायी नव्हती. पहिल्या हंगामात तो दोन अर्धशतक आणि २१.७५ च्या सरासरीने धावा करू शकला. तरीही २०११ साली झालेल्या लिलावात बंगळुरूने त्याला संघात कायम ठेवले.
२०२२ साली आरसीबी पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत विराट म्हणाला, “मला लिलावात आणण्यासाठी अनेकांनी विचारणा केली. पण आरसीबीने पहिली संधी दिली. त्यानंतर पुन्हा संघात ठेवले. माझ्यावर जो त्यांनी विश्वास दाखवला, तो माझ्यासाठी खास होता.” विराट कोहलीने २०२१ पर्यंत आरसीबी संघाचे नेतृत्वही केले होते. मी निवृत्त होईपर्यंत आरसीबीच्याच संघात राहणार, असे कोहलीने याआधी जाहीर केलेले आहे.
प्रदीप संगवान कुठे गेला?
प्रदीप संगवान २००८ ते २०१० अशी तीन वर्ष दिल्लीकडून खेळला. त्यानंतर तीन वर्ष तो कोलकाता संघाकडून खेळला. मात्र त्याला फार संधी मिळाल्या नाहीत. पुढची दोन वर्ष आयपीएल संघांनी त्याच्या नावात स्वारस्य दाखवले नाही. २०१६ वर्षी तो गुजरात लायन्स संघाकडून खेळला. एका वर्षाच्या विश्रांतीनंतर तो मुंबई इंडियन्स संघात आला. २०२२ मध्ये गुजरात टायटन्सने त्याला ताफ्यात दाखल केले. १८ वर्षात प्रदीप ५ विविध संघांकडून खेळला. आयपीएलमध्ये त्याने ३९ सामन्यात ३५ विकेट्स पटकावल्या आहेत. दिल्लीकर संघाने ताफ्यात सामील करूही प्रदीपची आयपीएल कारकीर्द बहरली नाही. मात्र मूळचा दिल्लीकर आणि आरसीबीचा कणा झालेला कोहली आयपीएलचा ब्रँड झाला.