Irfan Pathan and fans were furious after Sanju Samson was not selected in Indian squad: विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात संजू सॅमसनचे नाव नाही. निवडकर्त्यांनी पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी वेगळा संघ आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी वेगळा संघ निवडला आहे, परंतु संजू सॅमसन यापैकी कोणत्याही संघाचा भाग नाही. आशिया कपमध्ये बॅकअप खेळाडू म्हणून भारतीय संघासोबत प्रवास करणाऱ्या संजू सॅमसनकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. यावेळी भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणलाही निवड समितीचा हा निर्णय आवडला नाही.

इरफान पठाणने व्यक्त केली नाराजी –

संघाची घोषणा झाल्यानंतर पठाणने एक्स (ट्विटर) अॅपवर एक पोस्ट केली होते, ज्यामध्ये त्याने म्हटले की, “जर मी संजू सॅमसनच्या जागी असतो तर आज मी खूप निराश झालो असतो…” संजू सॅमसन, ज्याची वनडेमध्ये सरासरी ५५ आहे, त्याने १ ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध निवडण्यात आलेल्या भारतीय संघात तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे, मात्र त्यांच्यापूर्वी पदार्पण केलेल्या संजूकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले.

संजू सॅमसनचा वनडेतील कामगिरी –

जुलै २०२१ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून, संजू सॅमसनने २ वर्षांत भारतासाठी केवळ १३ सामने खेळले आहेत. संजूने १२ एकदिवसीय डावात ५५.७१ च्या सरासरीने ३९० धावा केल्या आहेत, ज्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यात संजूचा स्ट्राईक रेटही १०० च्या वर आहे, परंतु हे आकडे असूनही निवडकर्ते सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मासारख्या खेळाडूंना प्राधान्य देत आहेत. सूर्यकुमार यादव वनडेत सातत्याने फ्लॉप ठरला आहे, तर तिलक वर्माने आशिया चषकात वनडे पदार्पण केले आहे.

हेही वाचा – चेतेश्वर पुजारावर घालण्यात आली बंदी! कर्णधार असण्याची मिळाली शिक्षा, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

रोहित शर्मा आणि बीसीसीआयवर चाहत्यांचा गंभीर आरोप –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात सॅमसनची निवड न केल्याने चाहत्यांनी बीसीसीआयवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय संघाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असलेल्या सॅमसनबाबत चाहत्यांचे मत आहे की, बोर्ड या खेळाडूशी भेदभाव करत आहे. त्याच वेळी, काही चाहत्यांचे म्हणणे आहे की रोहित फक्त त्याच्या आवडत्या खेळाडूंना संधी देत ​​आहे.

हेही वाचा – IND vs AUS; ‘आम्हाला काही खेळाडूंची चाचणी आणि…’; वनडे मालिकेसाठी निवडलेल्या संघावर रोहित शर्माची प्रतिक्रिया

आशिया कप २०२ साठी संजूला टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले नाही, तर रोहितने सूर्यकुमार आणि तिलक यांची संघात निवड केली. संजू आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार आहे, तर सूर्यकुमार आणि तिलक आयपीएलमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्समध्ये खेळतात.