भारताचे माजी क्रिकेटर कपिल देव यांनी १९८३ मध्ये त्यांच्या नेतृत्वातील संघाने भारतासाठी पहिला विश्वचषक जिंकूनही २ गोष्टींचं खूप दुःख झाल्याचं आणि त्याची सल आजही ४० वर्षांनंतर मनात असल्याचं बोलून दाखवलं आहे. यातील पहिलं दुःख त्यावेळच्या संघातील खेळाडू सुनिल वॉल्सनविषयी आणि दुसरं दुःख सुनिल गावस्कर यांच्याविषयी असल्याचं कपिल देव यांनी सांगितलं. ते १९८३ विश्वचषकावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

कपिल देव म्हणाले, “मला दोनच गोष्टींचं दुःख वाटतं. एक सुनिल वॉल्सन खेळू शकला नाही. इतक्या वर्षांनी मी त्याकडे पाहतो तर असं वाटतं की त्याला खेळवलं असतं तर तोही खेळू शकला असता. दुसरं दुःख होतं सुनिल गावसकर त्यावेळी ५० धावा करु शकला असते तर तेही चांगलं झालं असतं. या दोन गोष्टींमुळे फार दुःख झालं.”

“एवढा मोठा खेळाडू त्याची कामगिरी इतकी कमी कशी असू शकते असं वाटलं”

“सुनिल गावसकरसारखा एवढा मोठा खेळाडू त्याची कामगिरी इतकी कमी कशी असू शकते असं वाटलं. ४० वर्षांनी असं वाटतं की सुनिल वॉल्सनही खेळला असता तर चांगलं झालं असतं,” असं कपिल देव यांनी सांगितलं.

“भारतीय संघाला स्वतःबद्दल आत्मविश्वास आला तो सर्वात मोठा ‘टर्निंग पॉईंट’ होता”

कपिल देव म्हणाले, “विश्वचषक जिंकताना केवळ एकच टर्निंग पॉईंट नव्हता. पहिल्या सामन्यापासूनच टर्निंग पॉईंट सुरू झाले. वेस्ट इंडिजचा संघ त्याआधी कुणाकडूनही पराभूत झाला नव्हता. तेव्हा भारताचा संघ अगदी छोटा होता. वेस्ट इंडिज भारताकडून पराभूत झाला. त्यानंतर प्रत्येक सामन्यात काहीतरी घडत होतं. १९८३ मध्ये भारतीय संघाला स्वतःबद्दल विश्वचषक जिंकण्याचा आत्मविश्वास आला तो सर्वात मोठा ‘टर्निंग पॉईंट’ होता”

हेही वाचा : “मी पहिलं मराठी वाक्य शिकलो ते म्हणजे ‘आई मला…’”, कपिल देव यांनी सांगितले भन्नाट किस्से

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अनेकदा आपल्याला आपल्या क्षमतेचा अंदाज नसतो. कुणी चांगला गाऊ शकतो, कुणी चांगला लिहू शकतो तसंच भारतीय संघाला आपल्या संघात दम आहे हे विश्वास आला. त्या दिवशी संपूर्ण खेळ बदलला. त्याआधी मी कर्णधार होतो यात संशय नाही, पण त्या टर्निंग पॉईंटनंतर मी कर्णधार नव्हतो. त्यानंतर संपूर्ण संघच कर्णधार होता. जेव्हा संघ काहीतरी मिळवायचं आहे हे ठरवतो तेव्हा कुणीच थांबवू शकत नाही,” असं कपिल देव यांनी सांगितलं.