KL Rahul created many records by scoring his second Test century in Centurion : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा पहिला डाव २४५ धावांवर आटोपला. पहिल्या दिवशी टीम इंडियाची फलंदाजी खूपच खराब होती, पण यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलने संघाच्या डावाची जबाबदारी घेतली. खेळाच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने ८ विकेट गमावून २०८ धावा करत खेळायला सुरुवात केली. राहुलने दुसऱ्या दिवशीही आपला चांगला फॉर्म सुरू ठेवत आपले शतक पूर्ण केले.
केएल राहुलने सेंच्युरियनमध्ये झळकावले शतक –
केएल राहुल मैदानात आला, तेव्हा टीम इंडियाने ९२ धावांवर ४ विकेट गमावल्या होत्या. यानंतर त्याने खालच्या फळीतील फलंदाजांसह छोट्या भागीदारी करत संघाची धावसंख्या वाढवली आणि शानदार शतक झळकावले. केएल राहुलने १३३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने १४ चौकार आणि ४ षटकार मारले. मात्र, त्याच्या शतकानंतर तो आपला डाव जास्त पुढे नेऊ शकला नाही आणि १०१ धावा करून बाद झाला.
सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या बाहेरच्या फलंदाजांच्या यादीत केएल राहुल पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
याआधी या यादीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे नाव पहिल्या स्थानावर होते. या मैदानावर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण २४९ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर केएल राहुलच्या आता सेंच्युरियनमध्ये २६१ धावा झाल्या आहेत. त्याचबरोबर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून दक्षिण आफ्रिकेत सर्वोच्च धावसंख्या नोंदवणारा फलंदाज ठरला.
दक्षिण आफ्रिकेत भारतीय यष्टीरक्षक म्हणून सर्वात मोठी कसोटी खेळी –
१०१ धावा – केएल राहुल, २०२३
१००* धावा – ऋषभ पंत, २०२२
९० धावा – एमएस धोनी, २०१०
६३ धावा – दीप दासगुप्ता, २००१
६३ धावा – दिनेश कार्तिक, २००७
केएल राहुलच्या ८ पैकी ८ शतके परदेशात –
केएल राहुल पॅव्हेलियनमध्ये परतणारा भारताकडून शेवटचा फलंदाज ठरला. केएल राहुलने आतापर्यंत एकूण ८ कसोटी शतके झळकावली आहेत. यापैकी त्यांनी ७ परदेशात झळकावली आहेत. केएल राहुलचे सेंच्युरियनमधील हे दुसरे कसोटी शतक आहे. यापूर्वी त्याने डिसेंबर २०२१ मध्ये याच मैदानावर शतक झळकावले होते. तीही बॉक्सिंग डे टेस्ट होती.
टीम इंडिया पहिला डाव २४५ धावांवर आटोपला –
या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर टीम इंडिया प्रथम फलंदाजीला आली. पहिल्या डावात २४५ धावा करून संघ सर्वबाद झाला. केएल राहुलशिवाय विराट कोहलीने ३८ आणि श्रेयस अय्यरने ३१ धावा केल्या. शार्दुल ठाकूरनेही २४ धावांचे योगदान दिले. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ५ बळी घेतले. नांद्रे बर्जरने ३ तर मार्को जेनसेन-गेराल्ड कोएत्झीने प्रत्येकी एक विकेट घेतली.