भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाजांपैकी एक असल्याचे प्रशस्तिपत्रक ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंगने दिले. मात्र, त्याच वेळी कसोटीत कोहलीला सर्वोत्तम म्हणण्याची वेळ अद्याप आली नसल्याचेही त्याने सांगितले. तो म्हणाला, ‘‘कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे का? तर हो. सहा ते सात महिन्यांत कोहलीने आपल्या खेळाला एक वेगळीच उंची गाठून दिली आहे.’’
कोहलीने २०१६ या वर्षांत कसोटी संघाचे कर्णधारपद भूषविताना भारताला वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध सलग मालिका विजय मिळवून दिले. त्यानंतर एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीही त्याच्याकडे आली. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषविण्याच्या अनुभवातून कोहलीचा खेळ अजून बहरेल, असे पाँटिंगला वाटते. ‘‘त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम म्हणणे धारिष्ठय़ाचे ठरेल, परंतु एकदिवसीय क्रिकेटमध्ये असे म्हणायला हरकत नाही. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचे विक्रम अप्रतिम आहेत आणि इतरांपेक्षा तो वरचढ ठरतो. मात्र, कसोटी क्रिकेटचा विचार करता त्याला काही वर्षांचा वेळ द्यायला हवा,’’ असे पाँटिंग म्हणाला.
‘‘दिग्गज खेळाडूंमध्ये नेहमी सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, जॅक कॅलिस यांचा उल्लेख आवर्जून होतो. त्यांच्या नावावर शंभरहून अधिक कसोटी सामने आहेत. कोहली या प्रवासात अध्र्यावरही पोहोचलेला नाही आणि त्यामुळे त्याला दिग्गज म्हणणे आततायीपणाचे असेल,’’ असे पाँटिंगने सांगितले.
भारतात मोठी धावसंख्या उभारण्याचे आव्हान -लेहमन
भारतीय खेळपट्टींवर चिवट खेळ करून ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारून देण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना पेलावे लागणार असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी व्यक्त केले. त्यासाठी माजी फलंदाज मॅथ्यू हेडन आणि डॅमियन मार्टिन यांच्यासारखी अविश्वसनीय खेळी सध्याच्या संघातील फलंदाजांना साकारावी लागेल, असेही लेहमन म्हणाले.
[jwplayer zZz7idXw-1o30kmL6]