जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीची वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याच्या जागी रोहित शर्माकडे कमान सोपवण्यात आली आहे, जो आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जबाबदारी सांभाळेल. विराटला कर्णधारपदावरून हटवण्याबाबत भारताचे माजी प्रशिक्षक मदन लाल यांनी बीसीसीआयचा हा निर्णय योग्य नसल्याचे म्हटले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी विराटच्या जागी रोहित शर्माला वनडे संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले. विराट कोहलीने आधीच टी-२० विश्वचषकानंतर सर्वात लहान फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले होते. अशा स्थितीत तो आता केवळ कसोटी फॉर्मेटमध्येच कर्णधारपद सांभाळत आहे. विराटला कर्णधारपदावरून हटवणे योग्य नाही, असे मत मदन लाल यांनी व्यक्त केले.

मदन लाल यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितले, “मला माहीत नाही की निवड समितीला याबद्दल काय वाटले, पण जर कोहली चांगला निकाल देत असेल तर त्याला जबाबदारी न देण्याचा निर्णय का घेण्यात आला? मी समजू शकतो की त्याने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले, कारण तिथे खूप क्रिकेट होत आहे. त्यामुळे त्याला उर्वरित दोन फॉरमॅटवर आपले लक्ष केंद्रित करायचे आहे.” विराट कोहलीचा वनडेत विजयाचा विक्रम ७० टक्क्यांहून अधिक आहे. हे पाहून काही चाहत्यांनी तो एक चांगला कर्णधार असल्याचे मत व्यक्त केले. दोन वर्षांनंतर भारतात होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषकात विराटने संघाचे नेतृत्व करावे, असेही मदन लाल म्हणाले.

हेही वाचा – VIDEO : एक घाव अन् शंभर तुकडे..! रोहित शर्माचा ‘तो’ शॉट पाहून कोचही झाला स्तब्ध; ‘अशी’ दिली दाद!

१९८३च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य मदन लाल पुढे म्हणाले, ”पण जर तुम्ही यशस्वी झालात आणि त्यानंतरही तुम्हाला काढून टाकले तर अशा गोष्टी मनाला लागतात. २०२३ च्या विश्वचषकापर्यंत कोहली संघाचा कर्णधार असावा असे मला वाटत होते. संघ तयार करणे खूप कठीण आहे परंतु तो सहजपणे उद्ध्वस्त होऊ शकतो.”