Maharashtra Kesari 2025 Shivraj Rakshe Mahendra Gaikwad : अहिल्यानगरमध्ये रविवारी (२ फेब्रुवारी) महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य व अंतिम फेरी पार पडली. पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला. पैलवान पृथ्वीराज मोहोळने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाडवर मात करत महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा पटकावली. मात्र, या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंचांबरोबर वाद घातल्यामुळे कुस्तीगीर परिषदेने महेंद्र गायकवाडवर तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. तर उपांत्य फेरीतही असाच वाद पाहायला मिळाला होता. उपांत्य फेरीत मोहोळ विरुद्ध पैलवान शिवराज राक्षे यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात ४० सेकंदात पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं. पंचांनी चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याचा आरोप करत शिवराज राक्षे यानी पंचांशी वाद घातला. शिवराजने एका पंचाला लाथ देखील घातली. त्यमुळे कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित केलं आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य सामन्यावेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या सामान्यात अवघ्या ४० सेकंदात पृथ्वीराज मोहोळने शिवराजला आपटलं. त्यानंतर पचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केलं. मात्र शिवराजने, त्याच्या प्रशिक्षकांनी व इतर उपस्थितांनी दावा केला आहे की शिवराजचे दोन्ही खांदे जमिनीला टेकलेच नव्हते. शिवराजने देखील रिव्ह्यूची मागणी केली. मात्र पचांनी त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. परिणामी शिवराजने गोंधळ घातला. मैदानात धक्काबुक्कीही सुरू झाली. तब्बल अर्धा तास हा गोंधळ चालू होता. शिवराजने संतापून पंचांना लाथ देखील मारली. अर्ध्या तासाने स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात महेंद्र गायकवाड व पृथ्वीराज मोहोळ आमने सामने होते. मात्र हाफ टाइममध्ये महेंद्रने पंचाशी वाद घालायला सुरुवात केली. त्याने पंचांना शिवीगाळ केल्याचा दावा केला जात आहे. त्यापाठोपाठ महेंद्रने थेट मैदान सोडलं. त्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित केलं. दरम्यान, शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड या दोन्ही पैलवानांच्या गैरवर्तनाची दखल घेऊन कुस्तीगीर परिषदेने या दोघांना तीन वर्षासाठी निलंबित केलं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी टीव्ही ९ मराठीला याबाबतची माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवराज राक्षेचा निकालावर आक्षेप

दरम्यान, शिवराज राक्षे याने सामन्याचा रिव्ह्यू करण्याची मागमी केली आहे. तसेच त्याने म्हटलं आहे की माझे खांदे जमिनीला टेकल्याचं दिसलं तर मी माझा पराभव स्वीकारेन.