२०२० साली पार पडणाऱ्या आशियाई चषकाचं यजमानपद अखेर पाकिस्तानकडेच सोपवण्यात आलेलं आहे. सिंगापूर येथे आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गतविजेता भारत या स्पर्धेत सहभागी होणार की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान देशांमध्ये क्रिकेट खेळलं जात नाहीये. २०१८ साली युएईमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत बांगलादेशवर मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००८ साली भारताने पाकिस्तानमध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. त्यानंतर अतिरेकी हल्ल्यांमुळे भारताने पाकसोबत खेळण्यास नकार दिला. मध्यंतरी बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीने आयसीसीला पत्र लिहीत दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यामुळे आशिया चषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे देण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अवश्य वाचा – Video : त्या फिल्डरची जागा बदल ! जेव्हा धोनी बांगलादेशच्या गोलंदाजाला सल्ला देतो

बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी सिंगापूरला झालेल्या बैठकीत हजर होते. या बैठकीत भारत-पाक यांच्यामधले राजकीय संबंध न सुधारल्यास स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी हलवण्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे. याच बैठकीत २०२२ आशियाई खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करावा याबद्दलही चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात, बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यातला तणाव मिटतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Video : मराठमोळा केदार जाधव झळकणार Race 4 चित्रपटात, रोहित शर्माने दिले संकेत

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan set to host asia cup 2020 will defending champions india participate
First published on: 29-05-2019 at 15:17 IST