Prithvi Shaw: भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ गेल्या काही वर्षांपासून संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. फिटनेस आणि फॉर्ममुळे त्याला संघातील स्थान गमवावं लागलं आहे. आधी मुंबईने त्याला संघाबाहेर केलं. त्यानंतर आयपीएल २०२५ स्पर्धेत झालेल्या लिलावात तो अनसोल्ड राहिला. आता आगामी हंगाम पाहता त्याने मुंबई संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून एनओसीची (ना हरकत प्रमाणपत्र) मागणी केली आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉने एनओसीची मागणी केली आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. फिटनेस आणि खेळातील शिस्त नसल्यामुळे त्याला संघाबाहेर करण्यात आलं होतं. मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याला फिटनेसवर मेहनत घेण्याचा आणि वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. त्याच्यासाठी फिटनेसचा प्लॅन देखील तयार केला होता. मात्र त्याच्या फिटनेसवर कुठलाही परिणाम झालेला नाही. त्याला मुंबईच्या रणजी संघातील स्थान गमवावं लागलं . त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीसाठीही त्याला स्थान देण्यात आलं नव्हतं.

पृथ्वी शॉ ने मुंबई क्रिकेट असोसिएशनला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, “ कारकिर्दीतील या वळणावर मला दुसऱ्या राज्याकडून क्रिकेट खेळण्याची ऑफर मिळाली आहे. मला विश्वास आहे की, या निर्णयामुळे मी क्रिकेटपटू म्हणून प्रगती करु शकेल. त्यामुळे मी विनंती करतो की, मला आगामी हंगामात इतर राज्याच्या असोसिएशनचं प्रतिनिधित्व करता यावं त्यासाठी तुम्ही एनओसी द्यावी.”

पृथ्वी शॉने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचं प्रतिनिधित्व केलं आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ५८ सामन्यांमध्ये त्याने ४५५६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १३ शतकं आणि १८ अर्धशतकं झळकावली आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमधील ६५ सामन्यांमध्ये ३३९९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १० शतकं आणि १४ अर्धशतकं झळकावली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला भारतीय संघाकडून ५ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ३३९ धावा केल्या आहेत. तर ६ वनडे सामन्यांमध्ये त्याने १८९ धावा केल्या आहेत.