महाराष्ट्राच्या संघाने रणजी करंडक स्पर्धेत सोमवारी इतिहास घडवला. बंगालसारख्या अव्वल संघाला चीतपट करीत महाराष्ट्राच्या संघाने रणजी करंडक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. १९९३ नंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राचा संघ रणजी करंडक स्पर्धेची अंतिम लढत खेळणार आहे. अंतिम लढतीत महाराष्ट्रासमोर पंजाब आणि कर्नाटक यांच्यातील विजेत्याचे आव्हान असेल. विशेष म्हणजे याआधी महाराष्ट्राने दोनदा रणजीचे जेतेपद पटकावले आहे. १९४०-४१ हंगामात महाराष्ट्राने जेतेपदावर नाव कोरले होते. बंगालच्या वृद्धिमान साहाने झुंजार शतक झळकावत बंगालचा डावाचा पराभव टाळला, मात्र ते महाराष्ट्राचा विजयरथ रोखण्यासाठी पुरेसे नव्हते. १६८ धावांची तडाखेबंद खेळी करणारा संग्राम अतितकर आणि सामन्यात १० विकेट्स मिळवणारा समद फल्ला महाराष्ट्राच्या विजयाचे शिल्पकार ठरले.  १ बाद १६ वरून पुढे खेळणाऱ्या बंगालने डावाचा पराभव टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. वृद्धिमान साहाने खेळपट्टीवर नांगर टाकून खेळ करीत १५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १०८ धावांची खेळी साकारली. सुदीप चटर्जीने ४९ तर सौरव सरकारने ३५ धावा करीत वृद्धिमानला चांगली साथ दिली. शेवटच्या दोन विकेट्ससाठी अर्धशतकी भागीदारी झाल्याने महाराष्ट्राचा विजय लांबला. साहा टिच्चून फलंदाजी करीत असताना महाराष्ट्राचे गोलंदाज सातत्याने विकेट्स मिळवत होते. त्यामुळे महाराष्ट्र डावाच्या फरकाने विजय मिळवणार असे चित्र होते. मात्र बंगालच्या शेपटाने झुंज दिल्याने महाराष्ट्राच्या फलंदाजांना विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी खेळपट्टीवर उतरावे लागले. बंगालचा दुसरा डाव ३४८ धावांत आटोपला. समद फल्ला, अनुपम संकलेचा आणि डॉमिनिक जोसेफ यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. ८ धावांचे नाममात्र लक्ष्य हर्षद खडीवाले आणि चिराग खुराणा यांनी सहज गाठले आणि महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.